Tuesday, September 20, 2011

आद्य अभियंता सर विश्वेश्वरय्या

आद्य अभियंता सर विश्वेश्वरय्या
 देशभर १५ सप्टेंबर हा आजचा दिवस अभियंता दिवस ( इंजिनिअर्स डे ) म्हणून साजरा केला जातो.  भारतातील पहिले अभियंता सर विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्वरय्या केवळ अभियंता नव्हते तर कट्टर व थोर देशभक्तही होते.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या अतिदुर्गम खेड्यात १८६१ साली १५ सप्टेंबरला या श्रेष्ठ अभियंत्याचा जन्म झाला. १९८४ साली अत्यंत कठीण असलेली इंजिनिअरिंगची अंतीम परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली.  व या देशातील पहिले अभियंता ( इंजिनिअर) बनण्याचा बहुमान मिळवला. वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचे निधन झालेले. घरात आठराविश्व दारिद्र्य. शिक्षणास पैसा नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ आईच्या उत्तम संस्काराने स्वतः च्या विद्वत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून बंगळूर येथे प्रारंभीचे शिक्षण विश्वेश्वरय्य यांनी पूर्ण केले. वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यांच्या बुद्धिमत्तेतील स्थापत्य विषयातील नैपुण्य लक्षात घेऊन त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती दिली गेली. आनि १९०४ साली त्यांना बधती मिळून संपूर्ण देशाचे ते पहिले अभियंता होण्याचा मान मिळाला. त्यावेळेपर्यंत या पदावर इंग्रज लोकच अभियंता म्हणून काम करत होते.
आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी ठिकठिकाणी २४ वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या नोकरीचा राजिनामा दिला. म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्या काळात त्यांनी कृष्णराज सागर हे कावेरी नदीवरील धरणाचे काम पूर्ण केले. त्यांना या कामाचे पारितोषिक म्हणून गौरवार्थ म्हैसूर संस्थानचे दिवानपद बहाल करण्यात आले. मूळात प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या विश्वेश्वरय्या यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजातील घटकांसाठी काही तरी करून दाखवण्याची जिद्द होती. त्यावेळी शेतकर्‍यांची परिस्थिती आजच्यासारखी शेतीशिक्षित नव्हती. त्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून म्हैसूर विद्यापीठाची स्थापना सरांनीच केली. भद्रावती येथील अवाढव्य लोखंड व पोलाद कारखाना हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे जिवंत प्रतिक आहे. खरे म्हणजे आज देशात दिसून येणार्‍या औद्योगिकीकरणाच्या प्रगतीचा मूहुर्तमेढ विश्वेश्वरय्या यांनी रोवला, असे म्हणायला हवे.
महात्मा गांधींजींच्या विनंतीनुसार त्यांनी देशाच्या वैभवात भर घालणारी अनेक कामे केली. सेवानिवृतीनंतर देशभरातील विविध संस्थांवर विविध पदांवर राहून चाळीस वर्षे अखंड काम केले. एडन शहराच्या पाणीपुरवठा व जलनि:सारणाच्या योजना राबवून इंग्रज अभियंत्यांना आश्चर्यचकित केले होते. सिंचन क्षेत्रातील ब्लॉक सिस्टीमचा पाया विश्वेश्वरय्या यांनी घालून दिला. महाराष्ट्रातील खडकवासला धरणातील स्वयंचलित दरवाजे ही त्यांचीच देणगी आहे. म्हैसुरी पद्धतीचा फेटा व साधी वेशभुषा आणि आकर्षित व्यक्तीमत्त्व लाभलेल्या विश्वेश्वरय्या यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. मानवात देव आहे व मानवाची सेवा हिच ईश्वर सेवा आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. वयाच्या ९४ व्या वर्षी भारतरत्न या परमोच्च किताबाने देशाने या अभियंत्याचा गौरव केला. विश्वेश्वरय्या शतायुषी हो ऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ ला त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.                                                                                  - मच्छिंद्र ऐनापुरे, जत  
dailysancharsolapur,15/9/10  

No comments:

Post a Comment