Tuesday, September 20, 2011

बालकथा

बालकथा                                                        भाज्यांनी धडा शिकवला.
टप्पूला चॉकलेट, कुरकुरे असलं बाहेरचं खाणं फार आवडे. चाट मसाल्याचा तर भारी शौकीन. त्याला आवडत नसायच्या त्या म्हणजे भाज्या. कुठलीच भाजी त्याला आवडायची नाही. त्यापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थांकडे तो ढुंकूनही पाहत नसे. त्याच्या या वाईट सवयीमुळे त्याची मम्मी त्याला नेहमी रागे भरायची. उपदेशाचे डोस द्यायची. पण टप्पूवर त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही. मम्मी पार वैतागून गेली होती.
टप्पूचा मामा येणार म्हणून मम्मीने त्याच्या आवडीचा गाजर हलवा बनवला होता. गोड तुपातला चवदार हलवा टप्पूनेही खावा म्हणून मम्मीने त्याला खूप सांगितले. पण व्यर्थ. तो आपल्या जिद्दीवर ठाम राहिला.
आपले सारे जग कोडकौतुक करतं. आपला महिमा गायिला जातो. पण हा टप्पू मात्र आपली हेटाळणी करतो. आपल्याकडे धुंकूनही पाहत नाही. याचा राग भाज्यांनाही होता. टप्पूला धडा शिकवायचा त्यांनी निश्चय केला.
टप्पूचा मामा आल्याने रात्री जेवणाचा मोठा बेत केला  होता. इकडे भाज्यांनीही आपली योजना साकारायला सुरुवात केली होती. दिवाणखान्यात मात्र मस्त गप्पाटप्पा रंगल्या होत्या. मामा आपल्या भाच्याला झक्कास गोष्टी सांगत होता. टप्पू त्या मन लावून ऐकत होता. स्वयंपाक खोलीतून घमघमाट सुटला होता. सगळ्यांना कडकडू भूक लागली होती. मम्मीने जेवण तयार असल्याची वर्दी दिली तशी सारी मंडळी जेवणाच्या टेबलाभोवती गोळा झाली.
बासुंदी, पुरी, गुलाम जामून ,विविध प्रकारच्या भाज्या, झक्कास रस्सा, पापड, कुरडई, लोणचे असा सारा बेत होता. टप्पूने घाईघाईने पुरीचा तुकडा  बासुंदीत बुडवून खाल्ला. " ई! बासुंदी कडू कशी काय? " टप्पू ओरडला. पप्पा ओरडले , " काय तर काय  बोलतोयस टप्पू? बासुंदी आणि कडू... ? वेडबिड तर लागलं नाही ना"
मामा म्हणाला, " अरे, टप्पू, बासुंदी किती गोड झालीय. आणि त्याला तू कडू म्हणतोयस ?" पण यातला मामला कुणालाच माहित नव्हता. कारण कारल्यानं आपला रस पिळून टप्पूच्या बासुंदीच्या वाटलीत टाकला होता. टप्पू मात्र त्या वाटीला हात लावायलासुद्धा तयार नव्हता. मम्मीने त्याला गुलाब जामून दिले. त्याने एक जामून तोंडात टाकले. टप्पूने ते पटकन थुंकून टाकले. दोड्क्याने बचकभर मीठ त्यात टाकले होते. " यात मीठ कोणी टाकले? ममीने जामून खाऊने पाहिले तर गोड लागले. मम्मी म्हणाली , जामून तर गोड आहे. " आता तीसुद्धा टप्पूवर चिडली. सगळे शांत आणि मनसोक्त जेवत होते. फक्त टप्पू मात्र कुरापती काढत  होता. " जेवायचे असेल तर जेव नाही तर उठून जा', मम्मी ओरडली. टप्पू मुकाट्याने उठून गेला.
रात्री सारे आपापल्या बिछान्यावर झोपी गेले. टप्पू अगोदरच येऊन पडला होता. पण त्याला झोप येत नव्हती. प्रचंड भूक लागली होती. पोटात कावळ्यांनी नुसता धिंगाणा घातला होता. सगळीकडे सामसूम झाल्यावर टप्पू हळूच गुपचूप उठला. त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन फ्रिज उघडला. कॅडबरी उचचली.  त्याचा लचका एक तोडला. पण कॅडबरी गोड लागण्याऐवजी तिखटजाळ लागली. तुकडा थुंकून दिला. बटाट्याने त्यात तिखट मिसळले होते. प्लेटमध्ये त्याला हलवा दिसला. जिभेचा दाह कमी होईल म्हणून त्याने एक चमचा हलवा तोंडात टाकला. गोड गोड हलव्याच्या  थंडव्याने त्याला खूप बरे वाटले. दाह कमी झाला. त्याने आवडीने सगळा हलवा संपवून टाकला.  आणि शांत झोपी गेला.
 सकाळी मम्मीने फ्रिज उघडला. त्यात हलव्याची प्लेट रिकामीच दिसली. तिने सगळ्यांना विचारले. टप्पूने आपण खाल्ल्याचे कबूल केले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. भाजी आणि भाज्यांच्या पदार्थांना नावे ठेवणारा , त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारा टप्पूने हलवा खाऊन टाकला  तोही न सांगता. टप्पू म्हणाला, " यापुढे भाज्यांना नावे ठेवणार नाही. भाज्या चांगल्या असतात, हे आता मला कळून चुकले आहे. "                                                                 - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment