Wednesday, September 21, 2011

सुट्टी घेणार्‍यांचा देश

       आपल्या देशाला सुट्ट्यांचा देश म्हटलं जातं. कारण आपल्या देशात सुट्ट्यांचा सुकाळ आहे. सरकारी कर्मचार्‍यांना तर साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर वर्षभरात विविध सुट्ट्यांचा एकप्रकारे खजिना उपलब्ध झाला आहे. शिक्षकांना दिवाळी आणि मे महिन्यात सुट्टी मिळते. १२ किरकोळ रजेसह आजारी, दिर्घमुदतीच्या रजा या हक्कांच्या सुट्ट्यांना तर मरण नाही. प्राध्यापक मंडळी तर एक पाय कॉलेजमध्ये तर एक पाय बाहेर अशा बेहिशेबी मामल्याने सुस्त का फुस्त झाली आहेत. त्यांना लेक्चरचा भार फारसा नसतो.कारण कॉलेजमधली  कळती आणि मो ठी मुलं आपला स्वार्थ  ओळखून असतात्.त्याप्रमाणे वागत असतात. मला एवढंच म्हणायचं आहे की, भारतात सुट्ट्या तर भरपूर आहेत. त्यात विविध कारणं सांगून सुट्ट्या घेण्याचा फंडा तर कमालीचा फोफावला आहे. त्यातल्या त्यात आजारी असल्याचं कारण सांगून कामाला टांग मारण्याची खोड मात्र अधिक असल्याचे दिसते.
        विशेष म्हणजे कामावरून सुट्टी घ्यायला आजार हे कारण पुरेसे आहे. शेवटी कारण ते कारणच असते. पण त्यात आजार म्हटलं की, त्यावर ' नो अपिल'. त्यामुळे आजाराचे कारण सांगून सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटता येतो. आपले भारतीय आजारी असल्याचं कारण सांगून सुट्टी 'एन्जॉय' करण्यात आघाडीवर असल्याचं एका सर्व्हेद्वारे स्पष्ट झाल्यानं काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही.कामाला दांडी मारण्याची खरोखरची कारणं वेगवेगळी असली तरी आजारी कारणापुढे काही चालत नाही. बॉस कारवाई करताना विचार करतो. तर सरकारी कर्मचार्‍यांना तर ती हक्काचीच सुट्टी वाटत असते. त्यामुळे कोण त्यांना बोलायला जात नाही. 
         कामाचा व्याप, कौटुंबिक कलह यासह अनेक प्रकारच्या अनेक कारणांमुळे ताणतणाव वाढत असतात, हे खरं आहे. आनि त्यात अशा गोष्टी  स्टाफ आणि अधिकार्‍यांपुढे बोलून चालणार नसतं. त्यामुळे खर्‍या कारणाला 'अळीमिळी' करून  'सिक लिव' घेण्याचं प्रमाण वाढत आहे, असं हा सर्व्हे सांगतो. भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, ब्रिटेन, मॅक्सिको आणि अमेरिका या देशांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, यात आजारी रजा काढण्याच्या प्रकारात आपल्यापुढे चिनी ड्रॅगन आहे. भारतातले लोक याबाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. चीनमधले जवळजवळ ७१ टक्क्यांपेक्षा अधिक लोक सिक लिव घेतात. तर भारतातले  ६२ टक्के लोक अशा सुट्टीचा उपभोग घेतात. आपल्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया ( ५८  टक्के), अमेरिका (  ५२), ब्रिटन  ( ४३) तर मॅक्सिकोमधील  ३८  टक्के लोक सिक लिव घेतात, असे आढळून आले आहे. म्हणजे खोटे-नाटे सांगून कामाला दांडी मारण्यात आपण आघाडीवर आहोत, हे स्पष्ट होते.
        वास्तविक  ताणतनावामुळे माणसाचे स्वास्थ बिघडत चालले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी सुट्टी काढून घरात बसल्याने हा ताणतणाव कमी होणार असतो का , हा मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कामाचा क्षीण घालवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. शिवाय सगळी कामं ज्या त्या वेळी, अचूक, अटोपशीर आणि विना टेन्शन न घेता केल्यास कामाचा थकवा जाणवणार नाही. अर्थात सगळेच अशा प्रकारे टेन्शन घेणारे किंवा कामचुकार नसतात. मात्र सर्व्हेक्षणाच्या टक्केवारीनुसार  

रजा काढण्याचे प्रमाण खरोखरच विचार करायला लावणारे आहे. कामात बदल हा सुद्धा थकवा घालवनारा पर्याय आहे. खरं 'ज्याची त्याची सोच' या मानवी स्वभावामुळे असली कारणं पुढं येत राहतात. 
           सगळा दोष कर्मचार्‍यांवर टाकून चालणार नाही. पण आता  काही कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी करताना दिसत आहेत. त्यांचा कंटाळा जावा, त्यांना नेहमी फ्रेश वाटावं, म्हणू अनेक क्लृप्त्या राबवत आहेत. कामात कुचराई करण्यात काही मंडळी आघाडीवर असली तरी खरोखरच ताणतणावामुळे सुट्टी काढून घरात बसणार्‍यांची अथवा तणाव घालवण्यासाठी अन्य उपाय शोधणार्‍यांची संख्याही मोठी आहे, याचाही विचार व्हायला हवा आहे.  आपल्या लोकांना कामावर वेळेत पोहचण्याचे बंधन कमालीचे टेन्शन देणारे आहे. यात त्यांना सवलत अथवा लवचिकता हवी आहे. काही कामे घरी राहूनही करता येण्यासारखी असतील तर तीही हवी आहेत. कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांमध्ये ऊर्जा टिकून राहावी, त्यांचे स्वास्थ चांगले राहावे , यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. सरकारी नोकरांनाही असली सवलत पहिल्यांदा हवी आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. कामाचा  ढिग पुढ्यात ठेऊन खुशाल गप्पा मारणार्‍या सरकारी बाबूंना लोक नेहमी पाहात आले आहेत. त्यांच्याविषयी कुणाला हमदर्दी नाही. वास्तविक असायची काही कारण नाही. कारण त्यांनी आपली विश्वासाहर्ता केव्हाच गमावली आहे. आणि हा सर्व्हे त्यांच्या नाकीपणाचीच  साक्ष देतो.                                                             _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment