Tuesday, September 27, 2011

बालकथा गुप्त अध्यात्म

एक राजा होता. त्याची राणी मोठी धार्मिक विचारसरणीची होती. तिचा बहुतेक वेळ परमेश्वराच्या भक्तीत जायचा. पूजापाठ तिच्या दिनक्रमातील प्रमुख अंग होते. तिला सर्व काही मिळालं होतं. कशाचीही कमतरता नव्हती. तिचा पती राजासुद्धा प्रेमळ होता. प्रजानुरागी, न्यायप्रिय राजा म्हणून त्याची ख्याती होती. राजा आपल्या कार्यात निपुण होता. फक्त राजा आस्तिक होता, याचंच तिला एकमेव दु:ख होतं. राजाला कुणी पूजापाठ करताना पाहिलं नव्हतं. राणीला याचीच मोठी खंत वाटत होती.
 एका रात्री तिसर्‍या प्रहरी राणीला अचानक जाग आली. तिनं पाहिलं की , महाराज झोपेत ' नारायण नारायण' असे काहीसे पुटपुटताहेत. ते पाहून तिला अत्यानंद झाला. महाराज झोपेत का होईना देवाचे नामस्मरण करत आहेत, ते पाहून तिने देवाचे आभार मानले. दुसर्‍यादिवशी तिने मोठा उत्सव साजरा केला. प्रजेला भोजनाचे निमंत्रण दिले. हा सगळा थाट पाहून राजाने विचारले, ' हा थाटमाट कशाचा? कशासाठी इतका मोठा सोहळा?'
राणी म्हणाली, ' मी काल रात्री तुम्हाला परमेश्वराचे नामस्मरण करताना पाहिले. माझा आनंड गगनात मावेनासा झाला आहे.'
हे ऐकून राजा चमकला. तो पुरता नाराज झाला. त्याचे आयुष्यभर चाललेले गुप्त अध्यात्म उघड्यावर पडले होते. भक्ती म्हणजे काही केवळ दिखाव्याची चीज नाही. ती आंतरिक ओढ आहे. मन निरंतर परमेश्वराच्या चरणी अचल राहावं, पण हात सतत कर्मासाठी झटायला हवेत, अशा विचाराच्या राजाला आता दु:ख वाटत होतं.
                                                                                                           _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment