Tuesday, September 27, 2011

मोबाईलः धोक्याची घंटा

सकाळचे दहा वाजून तीस मिनिट. बॉससोबत मिटिंग. अचानक गर्लफ्रंडचा फोन आला आणि तुमचा फोन वाजू लागला. ऑफचे बटन दाबता-दाबता बॉसबरोबरच बसलेल्या सर्व सहकार्‍यांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या. तुम्ही शरमेने मान खाली घालता.
तुम्ही एक फनी मेसेज आपल्या बॉयफ्रेंडसाठी लिहिले आहे. तेवढ्यात तुमच्या सिनिअरचा मेसेज फ्लॅश होतो. ' कुठे आहेस? रिपोर्ट कर.' तुम्ही घाईघाईत ,गोंधळलेल्या अवस्थेत बॉयफ्रेंडसाठी बनवलेला मेसेज सिनिअरला पाठवून देता. क्लिक झाल्यानंतर तुम्हाला जोराचा झटका बसतो. पण आता त्याचा काही उपयोग नाही.
... अशा उदाहरणांची यादी खूपच मोठी असू शकते. पण तुम्ही या दोन उदाहरणांवरून मी काय म्हणतोय, हे समजला असाल. तंत्रज्ञानाच्याबाबतीत म्हटलं जातं की, ते धारदार असे दुधारी शस्त्र आहे.  तुमच्याकडून  थोडी  जरी चूक झाली तरी  तुम्ही स्वतः घायाळ होता. म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय जगताही येत नाही आणि त्याच्यासोबत जगताना बेसावध  राहूनही  चालत नाही , अशी अवस्था होऊन जाते. अशात प्रेमाची गोष्ट असेल तर मात्र बोलायची सोयच नाही. तिचा (अथवा त्याचा)  फोन येईल किंवा मेसेज येईल  म्हणून तुम्ही सारी रात्र फोन स्वीच ऑफ करत नाही. काही वेळेला अशा फोन किंवा मेसेजच्या प्रतिक्षेत असताना तुम्हाला नेमकी अशी माणसं येऊन चिकटतात की, ती तुमची पाठच सोडत नाहीत. तुम्ही बाथरूममध्ये आहात आणि मोबाईल बाहेर. अशावेळेला मेसेज फ्लॅश होतो. ज्यांच्या नजरेला तो मेसेज पडायला नको, नेमका त्यांच्या दृष्टीलाच पडतो. मग दिवसभराचा प्रोग्रॅम कोलॅप्स होऊ शकतो.
याचा अर्थ तिचा ( अथवा त्याचा) मोबाईल म्हणजे एक नाही, दोन नाही  तर अनेक प्रकारच्या धोक्यांची घंटा आहे. थोडासा जरी बेसावधपणा झाला तरी अपघात व्हायला वेळ लागत नाही. पण आजकाल या गोष्टीची कुणी पर्वाच करत नाही. उपदेश तर केलाच जाऊ शकत नाही, अशी आजची यंग जनरेशन आहे. शिवाय सध्याचं युग मोबाईलचं आहे. सामान्य असो किंवा खास, बाजार असो अथवा कॉलेज, मुलगा असो की मुलगी सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतो. मोबाईल म्हणजे केवळ एकमेकांच्या संपर्कासाठी नाही. तर आजकाल लाईफ स्टाईल झाली आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत प्रत्येक गोष्ट मोबाईलद्वारा केली जाते.  कामाची गोष्ट असो किंवा बिझनेस डिल की प्रेमाची बात. प्लॅन बनवायचा असेल किंवा कुणाला एंटरटेन करायचे असेल, मोबाईल नसेल तर सगळे काम जिथल्या तिथे ठप्प.
सांगायची गोष्ट अशी की, आज मोबाईलशिवाय कुठलंही गोष्ट होऊ शकत नाही. मोठ्या संस्थांमध्ये कॉम्प्युटर, इंटरनेटशिवाय काही चालत नाही तसे व्यक्तिगत पातळीवर मोबाईलविना आपण सारे पंगू आहोत. मोबाईलने प्रायवसीला एक नवा आयाम दिला आहे. तुम्ही बसमध्ये, रेल्वेमध्ये आहात तरीही रिंग वाजते. तुम्ही बॉससोबत मिटिंगमध्ये आहात तरीही मोबाईलची घंटी वाजते. पण जर तुम्ही तो स्वीच ऑफ किंवा वायब्रेशन मोडमध्ये केला नाही तर मग तुमच्या 'मूड ऑफ'चे सामान त्याने बांधलेच  समजा.
गेल्या काही वर्षांपासून देशात मोबाईलच्या वापरासंबंधीचा शोध घेतला गेला, यात  अनेक बाबी समोर आल्या आहेत. ज्यांचे अफेयर ताजं आहे किंवा त्यात वादळवार्‍याने प्रवेश केला आहे, असे युवक बॉससमोर अगदी सरळ्सरळ उघडे पडल्याचे निदर्शनास आले आहे. पश्चिमी देशांमध्ये असं जाणवलं आहे की, युवा कर्मचारी आणि  त्यांच्या मोबाईलची घंटी ऑफिसच्या 'वर्क कल्चर'ला नुकसान पोहचवतात. त्यामुळे आता त्या देशांमध्ये मोबाईलच्याबाबतीत काही नियम बनवण्यात आले आहेत. कर्मचारी कंपनी परिसरात आल्यावर आपोआप त्याचा मोबाईल सिग्नल पकडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी कामावर असताना  मोबाईल स्वीच ऑफ करण्यास कर्मचार्‍यांना भाग पाडले आहे. आपल्या इथेही काही कंपन्यांनी हा फार्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे. कारण आपल्याकडे मोबाईलच्या बाबतीत आपण फारच बेपर्वा असल्याचे स्पष्ट झाले आहे.मोबाईलची घंटी वाजवण्याच्यासंदर्भात आपण खूपच बिनधास्त आहोत.
जर तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडचा ( अथवा गर्लफ्रेंडचा) ऑफिस अवरमध्ये मनाला वाटले म्हणून मोबाईल वाजवत असाल तर आता सावधान! यामुळे त्याची नोकरीसुद्धा जाऊ शकते. कारण यामुळे:  १) तुमच्या बॉयफ्रेंडची बॉससमोर चांगली इमेज राहत नाही. २) त्याला कामचुकार किंवा गप्पेबाजसुद्धा समजले जाऊ शकते. ३) यामुळे ऑफिसचं वर्क कल्चर बिघडतं. ४) सहकार्‍यांमध्ये तुम्ही आणि तुमचा बॉयफ्रेंड विनाकारण चर्चेचा विषय ठरता. ५) यामुळे तुमचा बॉयफ्रेंड आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकत नाही. आणि केलाच तर त्याची क्वॉलिटी घसरते. ६) ऑफिसमध्ये तुमच्या बॉयफ्रेंडचा प्रभाव घटतो.
                                                                                                              - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    ..

No comments:

Post a Comment