Tuesday, September 20, 2011

बालकथा अहंकार गळाला

बालकथा                                   अहंकार गळाला
एक पैलवान होता. कुस्तीत त्याला तोड नव्हती. साहजिक त्याच्यात अहंकार भिनला होता. तो इतका की बोलायचे काम नाही. कोणी कुस्ती खेळतोय म्हटलं की, पट्ट्या त्याच्या दारात हजर असायचा. त्याला धमकी द्यायचा. आव्हान द्यायचा. समोरच्याला चितपट केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. दुसर्‍याला पराजित करण्यात आसुरी आनंद वाटत असे. एखाद्याला मैदानात चितपट केल्यावर अहंकाराने तो मोठ्याने फुत्कारायचा. " आहे का कुणी माय का लाल, माझ्याशी कुस्ती लढायला तयार? या समोर असे."
या त्याच्या अहंकारी वागण्याने त्याच्याशी कोणीही कुस्ती लढायला तयार होत नसे. इतकेच काय तर त्याच्या वार्‍यालाही कोणी थांबत नसे. बोलणे तर दूरच! दिवस जात होते. आता पैलवानास एकटेपणाचा उबग येऊ लागला. एकटेपण त्याला खायला उठले. त्याची मनस्थिती बिघडू लागली. तो कुणाशी बोलायला जाई, पण ती माणसे निमुटपणे उठून निघून जात.
 एकदा एक संत महात्मा गावात आला. गावाबाहेर नदीकाठी झोपडी बांधून राहू लागला. त्यांना भेटायला , आशीर्वाद घ्यायला दूर्-दूरवरून लोक येत. संत महात्मा त्यांच्या अडीअडचणी, समस्यांचे निराकरण करीत असे. त्यामुळे त्यांचे महात्म्य दूर दूर पसरले होते. संतांचा महिमा पैलवानाच्याही कानी पडला. एक दिवस तोही संतांच्या भेटीला गेला.
" महाराज, मी एक प्रसिद्ध मल्ल आहे. माझा कुणीही पराजय करू शकला नाही. माझ्याजवळ खूप धन-दौलत, मान्-सन्मान आणि ऐश्वर्य आहे. पण माझे चित्त अशांत आहे." संतांनी स्मितहास्य केले, " मी तुझे नाव ऐकून आहे, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. पैलवानी ही एक कला आहे. ती अभ्यास, सरावाने साध्य होते. ..." त्यांचे बोलणे तोडत पैलवान मध्येच म्हणाला," महाराज, मी यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. दाही दिशांत माझ्यासारखा पैलवान शोधूनही सापडणार नाही. "  संत पुन्हा हसले आणि म्हणाले, " अहंकार रावणालासुद्धा होता. पण या अहंकाराने त्याची सारी शक्ती हिरावून नेली.जरा विचार कर. तू ज्या कुणाचा पराभव करायचास त्याला त्याचं दु: ख तर वाटत असणारच. तू कधीही पराजित झाला नाहीस. सदा जयाचीच चव चाखत आलास. त्यामुळे तुझ्या प्रत्येक विजयाने तुझा अहंकार वाढत गेला. पण माझ्या पैलवान मित्रा, जीवनातले सारे यश केवळ विजयात असत नाही. उद्या तुझे शरीर थकून जाईल. जर्जर होईल. हात-पाय कंप पावतील्.तेव्हा तुझा अहंकार आपोआप गळून पडेल. अजून वेळ गेलेली नाही. तुझे अशांत चित्त शांत कर. तुझ्यानंतर या धन्-दौलत, मान्-सन्मान, ऐश्वर्याला काय अर्थ आहे? तेच तू गोरगरीब, वंचितांच्या सत्कारणी लाव. असाह्य लोकांची सेवा कर. मग बघ, तुझा एक चांगला मल्ल त्याचबरोबर एक सच्चा साधक म्हणून नावलौकिक मिळेल. लोक तुझे गुणगान गातील."
पैलवान सदगदीत झाला, '" तुम्ही मला एक नवी वाट दाखवलीत. महाराज, तुम्ही माझे डोळे उघडलेत...मला आता जीवनाचं रहस्य समजलं", असे म्हणत पैलवानाने संतांचे पाय धरले.                                         ..                                                                                   .- मच्छिंद्र ऐनापुरे, जत                                        ..                                                                     

No comments:

Post a Comment