Tuesday, September 20, 2011

क्रीडा                             ' भारतरत्न ' साठी सचिनसोबत अन्य दिग्गज दावेदार
' भारतरत्न ’ कुणाला द्यावा , यासंबंधी जे निकष आहेत , त्यात  सचिन बसत नाही , असा मुद्दा समोर आला होता . कारण, आजवर जी - जी मंडळी या पुरस्काराची मानकरी ठरली आहेत , त्यांच्यात एकही क्रीडापटू नाही . कारण , हा किताब कला , साहित्य , संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणा - या व्यक्तीलाच दिला जावा , असा एक नियम आहे . त्यात क्रीडाक्षेत्राचा समावेश नाही . म्हणूनच हा नियम बदलल्याशिवाय सचिनला ‘ भारतरत्न ’ देता येणार नाही, अशी परिस्थिती होती. मात्र आता भारताच्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी क्रीडा क्षेत्राचा समावेश करण्याबाबत क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे शिफारस केली आहे. याबाबत चर्चा चालू असल्याबाबत केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे  या सन्मानाच्या श्रेणीत क्रीडा क्षेत्राचा समावेश होणार, ही बाब निश्चित आहे. मात्र आता या 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानासाठी दावेदारांची संख्याही वाढली आहे.  
'भारतरत्न' सचिनलाच पहिल्यांदा का द्यायचा? अन्य क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे काहीच योगदान नाही काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यान्चंद, टेनिसपटू रामनाथन कृष्णन आणि बुद्धिबळ चँपियन विश्वनाथ आनंद यांचेही योगदान  कमी नाही. त्यामुळे सचिनच्या अगोदर या खेळाडूंना या सन्मानाने गौरवले गेले पाहिजे. याचा अर्थ  त्याच्या योगदानात न्यूनत्व आहे, असे नाही. उलट त्याने देशाचा सन्मान क्रिकेट विश्वात वाढविला आहे. त्याने मिळवलेली उपलब्धी जगातल्या कुठल्याही खेळाडूला मिळवता आली नाही. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० हजारावर धावा बनवल्या आहेत. आता तो शतकांचे महाशतक बनवण्याच्या उंबरठ्यावर आहे. पुढील काही दिवसांत  तो हा सन्मान मिळवणारा जगातला पहिला खेळाडू बनेल, यात तीळमात्र शंका नाही. एकदिवशीय स्पर्धेत दुहेरी शतक जमवणारा तो एकमेव खेळाडू आहे. वास्तविक त्याच्या नावावर अनगणित रेकॉर्ड आहेत. आज तर अशी परिस्थिती आहे की, तो मैदानावर उतरला की कोणता ना कोणता विक्रम होतोच. आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यागणिक नवनवे विक्रम करणा-या सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव मानले जाते.त्याला भारतरत्न मिळावा ही तमाम भारतीयांची मागणी आहे, यात शंका नाही.
मात्र क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे का/ , असा प्रश्न निर्माण होतो. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखणार्‍या मेजर ध्यानचंदांची कामगिरी नजरेआड  करता येणार नाही. नव्हे, ती करताच येत नाही. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत शानदार कामगिरीने सार्‍या जगाला दिपवून टाकले होते. मेजर ध्यानचंद म्हणजे एक जिवंत  दंतकथा होती. चेंडू त्यांच्या स्टीकला चिकटतो, असे म्हटले जायचे. त्यासाठी त्यांच्या स्टीकची तपासणी केली जायची. आज देशाच्या या राष्ट्रीय खेळाची वाताहत झाली आहे. गेल्या तीन दशकापासून या खेळाचा देशावरचा प्रभाव अजिबात  राहिला नाही. त्यामुळे 'भारतरत्न'चा विषय निघतो तेव्हा या महान खेळाडूचा विचार केला जात नाही. रामनाथन कृष्णन खेळायचे त्या काळात आजच्यासारखी एटीपी रँकिंग नव्हती. पण अनधिकृतरित्या का होईना ते जगातल्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नक्की समावेशित  होते. त्यांनी ग्रँडस्लॅम स्पर्धेबरोबरच डेविस कपमध्येसुद्धा  भारताला नवी उंची देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. हां, त्यांची कामगिरी सचिनसारखी भारदस्त वाटत नाही. परंतु ते ज्या काळात खेळत, त्यावेळी देशात साचेबंदपणाही नव्हता, रँकिंगचा खेळ नव्हता. असे असले तरी  'भारतरत्न' च्या दावेदारांमध्ये त्यांचा समावेश नाकारता येत नाही.
विश्वनाथ आनंदने तर देशाच्या बुद्धिबळास एक नवी दिशा दिली आहे, जी कोणीही नाकारू शकत नाही. आनंदच्या अगोदर  ग्रँडमास्टर बनण्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या योगदानामुळेच देशात आज आपल्याकडे डझनावारी ग्रॅडमास्टर तयार झाले आहेत. विश्वनाथ आनंदने विविध स्तरावर आपला पताका फडकावत देशाच्या शिरपेचात नव-नवे तुरे खोवले आहेत. आनंदने स्पेनचे नागरिकत्व मिळवले असले आणि गेल्या काही वर्षांपासून ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केले नसले तरी तो एक भारतीय आहे, हे नाकारून चालत नाही. आज तो जो काही व्यक्तिगत  यश मिळवत आहे, ते भारतीय नागरिक म्हणूनच मिळवत आहे. त्यामुळे भारतरत्न देताना, त्याच्या दाव्याकडेही कानाडोळा करून चालणार नाही. सचिनला 'भारत्तरत्न'   देण्याच्या विरोधात क्वचितच कोणी असेल. पण त्याची अविश्वसनीय कामगिरी पाहूनच क्रीडा क्षेत्राचा 'भारतरत्न' निकषात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न चालला आहे, हे नाकारून चालत नाही. संपूर्ण देश सचिनला भारतरत्न दिल्याचे पाहण्यास आतुर आहे. पण त्याचबरोबरच असे करताना माजी दिग्गजांकडे दुर्लक्ष केले जाऊ  नये.                                                                                .- मच्छिंद्र ऐनापुरे, जत  gavakari, nashik sap.11
..                                                                     

No comments:

Post a Comment