Thursday, March 2, 2017

सांगलीचे श्रद्धास्थान संस्थान गणपती


     'वरदहस्त या नगरीवरती सदा गणेशाचा शब्दांमधुनी कसा वर्णू मी महिमा सांगलीचा', असं प्रभाकर खाडिलकर म्हणतात, ते काही खोटं नाही. सांगली म्हटली की, डोळ्यांसमोर उभे राहते ते भव्य-दिव्य गणपती मंदिर. म्हणूनच सांगलीला गणेशनगरीही म्हटले जाते. साङली संस्थानचे राजे चिंतामण पटवर्धन यांनी उभारलेले गणपती मंदिर आज केवळ सांगलीचेच आराध्य दैवत राहिलेले नाही,तर अख्ख्या महाराष्ट्राचे झाले आहे. अवघ्या महाराष्ट्रातून भाविक श्री च्या दर्शनाला येत असतात. गणपती मंदिराने सांगलीकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहेच, शिवाय शहराच्या वैभवाची पताकाही फडकवत ठेवली आहे.
      पुरातन,भव्या,देखण्या व दगडी वास्तूत वसलेले गणपती मंदिर. रिद्धी-सिद्दींसोबत असलेली सुंदर गणपतीची मूर्ती हे सांगलीचे श्रद्धास्थान आहे. तब्बल पावणेदोनशे वर्षांपासून सांगलीकरांच्या हृदयात घर केलेल्या या आराध्य दैवताची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळेच या मंदिराला तीर्थस्थळाइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.या मंदिराच्या उभारणीचा इतिहासही तितकाच रोचक व संघर्षपूर्ण म्हणावा लागेल.
मिरज जहागिरीतून बाजूला झाल्यानंतर श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली संस्थानची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याजवळ फक्त सिंहासनारुढ ताम्र धातूची श्री गणेशाची मूर्ती होती. चिंतामणराव रोज मनोभावे या मूर्तीची सेवाभावे पूजा करत आणि सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या,तर श्रींची प्रतिष्ठापना एका मंदिरात करू, असे आर्जवही ते गणेशाकडे करीत. कालांतराने चिंतामणरावांच्या मनाप्रमाणे सार्या गोष्टी घडल्या. सांगली संस्थानने विकासाची एक-एक शिखरे पादाक्रांत केली. संस्थानच्या विकासाचा झेंडा अटकेपार फडकवत असतानाच,चिंतामणरावांनी गणपती मंदिराच्या उभारणीचा संकल्प सोडला. प्रारंभी सध्याच्या माळबंगल्याच्या जागी मंदिराची उभारणी केली जाणार होती. तसे कामही सुरू झाले.पण पाण्याची कमतरता भासू लागल्याने अखेर मंदिर कृष्णाकाठी हलविण्यात आले.
     याठिकाणीही अडचणींचा डोंगर काही केल्या संपता संपत नव्हता. कृष्ठाकाठी चोहोबाजूंनी पाणीच पाणी होते. शिवाय नदीचा गाळ काठावर असल्याने जमिनीला थर नव्हती. पुराचा धोकाही होताच. अखेर तीस ते चाळीस फूट खोल चुनेगच्चीने भरून काढण्यात आला. त्यामुळे गावात कृष्णेचे पाणी शिरले तरी त्याला मंदिरात प्रवेश नव्हता. याचा विलक्षण अनुभव नव्या पिढीनेही 2005 मध्ये आलेल्या महापुरावेळी घेतला. मंदिराच्या उभारणीसाठी कठीण दगड हवा म्हणून जोतीबाच्या डोंगरातून काळा दणकट दगड आणण्यात आला. मोठ्या कष्टाने वडारी गाड्यातून दगड आणण्यात आले. गणपती मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला 1811 मध्ये सुरुवात झाल्याची नोंद आहे. सांगलीत सुरुवातीस गणेश दूर्गची उभारणी झाली. मंदिराचे बांधकाम 1844 च्या सुमारास पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. गणपती मंदिराच्या आवारातच शिव,सूर्य,चिंतामणेश्वरी,लक्ष्मी-नारायण अशा पाच देवांची देवपंचायतन मंदिरे आहेत.गणपतीची मूर्ती भीमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी बनवल्याच्या नोंदी आहेत. या मूर्तीसाठी शुभ्र संगमरवरी दगड वापरला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाबळेश्वर येथे आणलेल्या दगडांपैकी जो एक दगड शिल्लक होता,तो आप्पासाहेबांनी मिळवला. आणि देवालयाच्या बांधकामास सुरुवात केली. गणपती मंदिरासह परिसरातील चारही मंदिरांचे बांधकाम दगडांचेच असून भले मोठे खांब आणि त्यावरील नक्षीकाम येणार्या भाविकांना आकर्षित करून घेते. मंदिरात भाविकांची नेहमी वर्दळ असते. परंतु, अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला मोठी गर्दी असते.सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविक गणेशाच्या दर्शनाला येतात.
    सांगलीचे आराध्य दैवत गणपती असल्याने कोणताही नवा उपक्रम किंवा व्यवहाराची सुरुवात श्री च्या दर्शनानेच होते.देशातील मोजक्याच संपन्न आणि स्वायत्त देवस्थानापैकी सांगलीचे गणपती मंदिर हे एक आहे. संस्थानिकांच्या तीन पिढ्यांच्या कारकीर्दीत या मंदिराची उभारणी झाली आहे.श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी गेल्या दहा वर्षात मंदिर व परिसराचा कायापालट केला आहे. गणपती मंदिर आणि परिसराचा खुंटलेला विकास करण्यात विजयसिंहराजे यांचे मोठे योगदान आहे. गणपती संस्थानचे प्रमुख म्हणून त्यांना रितसर अधिकार मिळालेला आहे. विजयसिंहराजे अभियंते असून उद्योगपती,व्यवस्थापनातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी बजाज ग्रुपमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यानिमित्त काही काळ विजयसिंहराजे सांगलीत राहू शकले नाहीत. उद्योग-व्यवसायानिमित्त त्यांना मुंबई व दुबईत काही काळ वास्तव्य करावे लागले. या कालावधीत सांगली गणपती संस्थानची घडी विस्कटली होती. दरबार हॉल,गणेश मंदिराची दुरवस्था झाली होती. मंदिराच्या बाजूच्या संरक्षण भिंती मोडकळीस आल्या होत्या. या परिस्थितीत विजयसिंहराजेंनी दहा वर्षांपूर्वी सांगलीत वास्तव्यास येण्याचा महत्त्वपूर्ण घेतला.
     सांगलीत आल्यानंतर त्यांनी दरबार हॉलसह गणपती मंदिर आणि परिसराचा कायापालट केला. मंदिराभोवती आता फुललेली हिरवाई आणि सुंदर इमारतींची दुनिया हे राजे साहेबांच्या नेटक्या नियोजनाचेच फलित म्हणावे लागेल.संस्थानच्या उत्पन्नातून त्यांनी मंदिराचा अतिशय देखणा कायापालट घडविला आहे. सुनीती भवनची इमारत आकर्षक आहे. आता हा परिसर फुलांनी आणि हिरवाईने नटला आहे. एकात्मिक भवन हा राजेसाहेबांच्या आजपर्यंतच्या विचारांचा अविष्कार आहे. राजेसाहेब उत्तम संगीतकार असून मराठी,इंग्रजी,ऊर्दू,जर्मन,अरेबिक अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. आपल्याला अवगत असलेल्या भाषा समाजातील इतर घटकांनाही शिकता याव्यात,म्हणून त्यांनी सांगलीत ऊर्दू,जर्मन आदी बाषांचे वर्ग सुरू केले.ऊर्दूचा गंधही नसलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना त्यांनी अल्पावधीत त्या भाषा लिहायला आणि वाचायला तरबेज केले. यावरून त्यांच्यातील कुशल अध्यापकाची ओळख निर्माण होते.
राजवाड्यातील दरबार हॉल तर सांगलीचे वैभव आहे. मात्र तेही मोडकळीस आले होते. त्याची डागडुजी करून पूर्वजांची ही अनामत आता जपली आहे.येथे पहिल्या चिंतामणरावांचा पुतळा उभा करण्यापासून ते आतील भागाच्या सुशोभिकरणाबाबत जे राजेसाहेबांना हवे होते,तसे प्रत्यक्षात उतरवले आहे. याबरोबरच मिरजेतील सांगलीकर मल्यातील तीनशे वर्षांपूर्वीचे गणेश मंदिर व त्यातील मूर्ती अद्वितीय आहे. तेथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही आटपत आले आहे.



No comments:

Post a Comment