Monday, March 27, 2017

सबकुछ काही 'देशी गाई'साठी

     देशी गाईंची संख्या कमी झाली आहे,हे नाकारून चालत नाही. मात्र आता या देशी गाईंची संख्या वाढावी आणि तिच्या दुधापासूनच्या पदार्थांचा किंवा गाईच्या गोमूत्र,शेण यांचाही आपल्या दैनंदिन जीवनात वापर वाढायला हवा,यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहे. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यापासून तर याच्या जनजागृातीला वेग आला आहे. ही बाब चांगली असली तरी गाईच्या संगोपनासाठी शासकीय मदतीचीही आवश्यकता आहे. गाय भेकड झाल्यावर त्याच्या पालनासाठी आर्थिक सहाय्य महत्त्वाचे आहे. ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी देशी गायींच्या संगोपनासाठी आवाहन करणार्या संस्थांनी प्रयत्न करायला हवे आहे. गायींची संख्या वाढेलच पण त्यापासून चरितार्थही शेतकर्यांचा चालेल.

     परवा डॉ. निरंजनभाई वर्मा यांचे व्याख्यान झाले. त्यांनी मानवासह संपूर्ण विश्व कल्याणासाठी गाय पाळणे कसे  आवश्यक  आहे, हे आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितलेमनुष्याला व्याधीमुक्त करण्याबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्याची ताकद गायीच्या शेणात, गोमूत्रात व दुधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सृष्टीचे ऋतुचक्र समतोल राखून पर्यावरण रक्षणाची क्षमता त्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘चांगल्या प्रतीचे अन्न, चांगले आरोग्य आणि पर्यावरण रक्षण या तीनही बाबी मिळवण्यासाठी देशी गोधनाचे महत्त्व अधिक आहे. परंतु आज विविध कारणांनी गोधनाची संख्या रोडावत आहे. गाईचे मानवी जीवनात मोठे स्थान असून पर्यावरणाचा समतोल राखण्याला यातून मदत होते. गाईचे शेण, गोमूत्र आणि दुधामधील घटक मनुष्याला व्याधीमुक्त जीवन देण्यास साहाय्य करतात. यामुळे मानवातील चेतना जागवण्याचे काम केले जाते. शेणाद्वारे जमिनीचा कस सुधारून आपोआपच उत्पादन वाढीस मदत होते. गोमूत्राच्या बाष्पीभवनामधून हवा शुद्ध होण्यास मदत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, असेही ते म्हणाले.
     उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज असून त्यासाठी गाय पाळणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी गो-शाळा झाल्या पाहिजेत. मोठ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी गोमूत्र हा उत्तम पर्याय आहे. मानवाच्या शरीरातील पाच मूलतत्त्वे संतुलित राखण्यासाठी गोमूत्राबरोबरच ताक, तूप याचे सेवन करण्याची गरज आहे,हे सांगतानाच त्यांनी  या वेळी  गाईचे शेण, गोमूत्र, दूध याचे विविध फायदे, मानवाचे जीवन अधिक निरोगी राखण्यासाठी होणारा लाभ तसेच यातून पर्यावरण रक्षणासाठी होणारा फायदा याची सविस्तर माहिती देऊन कथन केली.गायींच्या संख्येत वाढ व्हावी आणि तिच्यापासून मिळणारे घटक मानवाला किती फायदेशीर आहेत, हे सांगण्यासाठी काही मंडळी राज्य,देश अशा सगळ्या भागात फिरत आहे.त्यामुळे गायीचे मूल्य आपणही लक्षात घेतले पाहिजे.
     गायीच्या संदर्भातील आणखी एक बातमी नुकतीच वाचायला मिळाली. गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करणारे रज्जाक पठाण यांना लोकसेवा-समाजसेवा विभागातील 1 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलारज्जाक पठाण यांनी आपल्या गोठ्यात दररोज 12 लीटर दूध देणारी खिल्लार गाय तसेच 28 लीटर दूध देणार्या गीर गायींची पैदास केली आहे. जातिवंत गायींची पैदास करून त्या गायी ते शेतकर्यांना दान करतात. भाकड देशी गायी दुभत्या बनवून त्यांनी शेतकर्यांच्या दावणीला बांधल्या आहेत. 650 विधवा महिलांच्या मुलांना ते शिक्षणासाठी मदतही करतात. ‘मुस्लीम गोपालकअशी त्यांची ओळख आजच्या काळातली नसून गेल्या तीन पिढ्यांची आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला खूप आनंद झाला. निरोगी राहायचे असेल, तर देशी गायी पाळणे गरजेचे आहे. ज्याला गाय पाळता येत नाही, त्याने देशी गायीचे दूध तरी प्यायले पाहिजे. सुदृढ भारत घडवायचा असेल व निरोगी राहायचे, तर गायी पाळण्याला पर्याय नाही, असेही ते आवाहन करतात. विशेष म्हणजे त्यांना 1 लाखाचे पारितोषिक देण्यात आले,त्यात आणखी एका लाखाची भर घालून त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकला. काही माणसं खरेच समाजाच्या उद्धारासाठी झपाटलेली असतात. ही दोन नावे त्यापैकीच आहेत. समाज सदृढ बनला पाहिजे, देशी गायींची पैदास वाढली पाहिजे, यासाठी झटणार्या या मंडळींना सलाम करावा तेवढा थोडाच आहे.

No comments:

Post a Comment