Saturday, March 11, 2017

हवाप्रदूषणाने छोट्या शहरांचेही अस्तित्व धोक्यात

       सद्यःस्थितीत हवाप्रदूषण ही सर्वांत मोठी समस्या बनली आहे. ऊर्जेची गरज दिवस पूर्ण करण्यासाठी, जीवाश्म इंधनाचा सतत वाढत जाणारा वापर, जलद औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्याचा पर्यावरणावर हानीकारक परिणाम होत आहे. ज्या वेगाने पर्यावरण ढासळत आहे, त्याचे दुष्परिणाम शहरवासीयांवर आणि इतर सजीवांवरही दिसून येत आहेत. हवा गुणवत्ता निश्चित करण्यासाठी, हवेचा आरोग्यावर होणारा परिणाम मुख्यत्वेकरून वैद्यकीय दृष्टीने संवेदनशील व्यक्तीवर होणारे परिणाम याचे मर्मभेदी मूल्यांकन करण्यासाठी एक्यूआय (हवा गुणवत्ता निर्देशांक) वापरला जातो. त्यामुळे एक्यूआय हा लोकांना हवा गुणवत्ता स्थिती कळण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. एक्यूआय एकच मूल्य दर्शविते. त्यामुळे समजून घेणे सोपे आहे. विविध प्रदूषके व त्यांचे वेगवेगळे प्रमाण यांची क्लिष्ट माहिती एकत्रित करून तिचे हवा गुणवत्ता निर्देशांकात रूपांतर करते. एक्यूआय श्रेणी बहुधा हवा गुणवत्तेच्या दृष्टीने व्यक्त केल्या जातात. चांगले, समाधानकारक, मध्यम, वाईट, अतिशय वाईट, विविध प्रदूषण तीव्रता आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम यावर आधारीत श्रेणींमध्ये वर्णन केल्या जातात.
     आपल्या महाराष्ट्र राज्यातील सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर सारख्या  शहरातील हवा गुणवत्ता श्रेणी मिश्रीत आहे. ही हवा गुणवत्ता हृदयरुग्ण, मुले आणि वृद्ध, प्रौढ लोकांना दमा आणि अस्वस्थता उत्पन्न करू शकते. फुफ्फुसाचा रोग असणार्या लोकांना श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोकांनाही अस्वस्थता उत्पन्न करू शकते. उच्च आरएसपीएम 10 पातळी हा घटक एकूण एक्यूआयमधील प्रमुख घटक आहे. आरएसपीएम 10 हे चिंतेचे कारण आहे. त्याकडे तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
     हानिकारक पदार्थ द्रव आणि घन दोन्ही, हवेत तरंगणारे सूक्ष्म धुलिकण, राख, घातक रसायने, सेंद्रिय घटक आदी हवेत एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त मिसळले जातात. तेव्हा हवा प्रदूषण झालेआहे असे समजले जाते. प्रदूषणाची सर्वात महत्वाची कारणे म्हणजे वाहतूक जीवाश्म इंधन वापर, उर्जा उत्पादन, औद्योगिक उपक्रम, खाणकाम, बांधकाम उपक्रम, कचरा जाळणे आदी आहेत. हवा प्रदूषणामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. सर्वात सामान्य आजार हवा प्रदूषण झाल्यानेही होऊ लागले आहेत. ॅलर्जीच्या समस्या, अस्थमा, दमा, त्वचारोग, श्वास घेण्यात अडचणी आदी रोग हवा प्रदूषणामुळे होतात. काही प्रदूषणाचे घटक अगदी कर्करोगासही कारणीभूत ठरतात. त्याबरोबरच हवा प्रदूषणामुळे आम्ल पाऊसही संभवतो. मुंबई,दिल्लीसारख्या मोठ्या शहरांची वायू प्रदूषणामुळे अवस्था मोठी चिंताजनक बनली असताना आता लहान शहरेदेखील या प्रदूषणात घेरली गेली आहेत.त्यामुळे आपली चिंता आणखी वाढली आहे. सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने यासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment