Monday, January 22, 2018

युगपुरुष सुभाषचंद्र बोस

     नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशा मध्ये कटकच्या एका बंगाली कुटुंबात झाला. नेताजींच्या वडिलांचे नाव जानकीदास बोस आणि आईचे नाव प्रभावती. सुभाषचंद्र बोस भारतीय इतिहासातील एक असे युग पुरुष होते ज्यांनी भारतीय स्वतंत्रता लढय़ाला एक नवीन भरारी दिली. नेताजींनी आजाद हिंद फौज तयार करून इंग्रज सरकारला हादरून सोडले. सुभाषचंद्र बोस आज भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहेत. २३ जानेवारी त्यांच्या जन्मदिनी त्यांनी रंगून येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण करून देणे गरजेचे आहे.

     ते आपल्या भाषणात म्हणाले होते, 'सहकार्‍यांनो स्वातंत्र्य बलिदान मागतं. आपण सर्वांनी स्वातंत्र्यासाठी आतापर्यंत खूप त्याग केला आहे, पण आपल्या प्राणांचे बलिदान अजून बाकी आहे. आपल्या शत्रूने आपले खूप रक्त आटवले आहे. त्याचा प्रतिशोध केवळ रक्तानेच घेतला जाऊ शकतो. त्यासाठी 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा' अशी प्रतिज्ञा त्यांनी सहकार्‍यांकडून लिहून घेतली. ज्याला आपल्या देशाला स्वतंत्र पाहायचे आहे त्याला प्राणाची पर्वी नक्कीच नसणार.' त्यांच्या या भाषणाने नेताजींची प्रतिमा आणखी उजळून निघाली. 
     नेताजी आणि महात्मा गांधीजींचे विचार परस्परभिन्न होते, पण ध्येय्य मात्र एकच होते. ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. हिंदुस्थानचे महान देशभक्त म्हणून देखील नेताजींना ओळखले जाते. नेताजी आयसीआय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी शपथ घेण्यास नकार देऊन वरिष्ठ अधिकारीच्या नौकरीकडे पाठ फिरवून भारतीय स्वतंत्रता आंदोलनात १९२१ मध्ये स्वत:ला झोकून दिले. नेताजी हे महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व सत्याग्रह या विचारांशी समरस झाले नाहीत. महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज हे नेताजींचे आदर्श होते. 
     १९२७ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा नेताजींनी सायमन कमिशनच्या विरोधात आवाज उठविला. त्याकाळी नेताजींच्या आचार, विचार व कतरुत्वाने तरुणवर्ग भारावून गेला होता. १९३८ साली राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद घेण्याचा बहुमान नेताजींना मिळाला. नेताजींनी हिटलर-मुसोलिनीची भेट घेवून भारतीय स्वातंत्र्याबाबत विचारविनिमय केला होता. फ्री इंडिया आर्मी आणि लिबेरेशन आर्मी नेताजींनी तयार केली. रासबिहारी बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. जुलै १९४३ मध्ये 'हिंदी स्वातंत्र्य संघा'ची व 'आजाद हिंद फौजे'ची सूत्रे नेताजींच्या हाती दिली. त्यामुळे नेताजी हिंदी स्वतंत्र संघाचे अध्यक्ष व आजाद हिंद फौजेचे सरसेनापती झाले. नेताजींनी आपल्या संघटन कौशल्याच्या तसेच कतरुत्वाद्वारे आजाद हिंद सेनेत कार्यक्षमता निर्माण केली. लोकांनी प्रेमाने सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही बिरुदावली बहाल केली. 'तिरंगा ध्वज' हे आजाद हिंद सेनेचे निशाण होते, तर 'जयहिंद' हे अभिवादनाचे शब्द होते. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा हे आजाद हिंद सेनेचे समरगीत होते.
     अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा व ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि १0 ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली. जपानच्या पराभवाने नेताजींना जबरदस्त धक्का बसला. देश स्वातंत्र्य करण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. नेताजी १८ ओगस्ट १९४५ रोजी बँकॉककडून टोकियोकडे विमानाने निघाले. मार्गामध्ये चीनजवळील फामोर्सा बेटामधील ताय पै विमानतळावर त्यांच्या विमानास अपघात होऊन त्यामध्येच नेताजींचा अंत झाला. हा जपान सरकारने दिलेला वृत्तांत आहे. अर्थात हा वृत्तांत भारतीयांना खरा वाटला नाही. त्यामुळे स्वतंत्र भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूबाबत दोन स्वतंत्र चौकशी समित्या नेमल्या. पण त्यांनाही नेताजींच्या मृत्यूचे गूढ पूर्णपणे उकलविता आले नाही. भारतीय नेते सत्यनारायण सिंह यांनी स्वत: फामोर्सास भेट दिली, अनेकांच्या साक्षी घेतल्या व त्यांनी १८ ऑगस्ट १९४५ रोजी फामोर्सातील ताय पै विमानतळावर अपघाताची कोणतीच नोंद नसल्याचे सांगितले. 
     सत्यनारायण सिंह यांच्या मते नेताजी मांचुरियात डिरेन येथे गेले. जपानच्या शरणागतीमुळे रशियाने मांचुरियावर ताबा मिळविला यावेळी ते रशियन सैन्याकडून पकडले गेले व रशियन सरकारने त्यांना सैबेरियात ठेवले. ते तेथेच असावेत किंवा मृत्यू पावले असावेत. नेताजींच्या मृत्यूचे गूढ रहस्य शेवटपयर्ंत रहस्यच राहिले. त्यांनी प्रज्वलित केलेली देशभक्तीची मशाल अशीच तेवत राहावी एवढीच अपेक्षा! 


No comments:

Post a Comment