Friday, August 17, 2018

वाहन चालवातानाचा बेजबाबदारपणा


     अलिकडच्या काळात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जगात अपघाताच्या बाबतीत भारत देश आघाडीवर आहे.इतर रोगांच्या आजाराने मृत्यू पावणाऱ्यासंख्येपेक्षा अपघाताने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघात हे अनावधानाने, नजरचुकीने होतात हे खरे असले तरी त्यामध्ये प्रामुख्याने बेजबाबदारपणा, बेपर्वाई किंवा 'चलता है' ही मानसिकता कारणीभूत असते हे नाकारता येणार नाही. वाहन चालवताना लक्ष केंद्रित नसणे, वाहनांच्या वेगाबाबतचे नियम न पाळणे, वाहनांची देखभाल-दुरुस्ती न करणे अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळे निष्पापांचा हकनाक बळी जात असतो. असे असूनही वाहतूक, प्रवास यादरम्यानच्या जबाबदारीची जाणीव नागरिकांना होताना दिसत नाही. 

अलीकडील काळात तर स्मार्टफोनवर गाणी लावून हेडफोनच्या सहाय्याने ऐकत वाहन चालवण्याची फॅशनच आली आहे; मात्र ही फॅशन किती क्रूर ठरू शकते याची झलक उत्तर प्रदेशातील अपघाताने दाखवून दिली आहे. उत्तर प्रदेशात गोरखपूरपासून ५0 किलोमीटर अंतरावर कुशीनगर भागात बेहपूर्वा येथील चौकीदार नसलेले रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना ही स्कूल बस एका रेल्वेवर आदळल्यामुळे १३ मुले आणि चालक अशा १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसचालकाने गाणी ऐकण्यासाठी इअरफोन लावला होता. या अपघातामुळे जुलै २0१६ मध्ये भदोही जिल्ह्यामध्ये झालेल्या एका अपघाताच्या आठवणी ताझ्या झाल्या. त्या घटनेमध्येही स्कूल बस चालक इअरफोन लावून बस चालवत होता. कानामध्ये इअरफोन लावून सार्वजनिक ठिकाणी वावरताना बळी गेलेल्यांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: रेल्वे क्रॉसिंग करताना तर बहुतांश तरुण-तरुणी इअरफोनवर गाणी ऐकत फिरत असतात. अशा वेळी त्यांना बाजूने येणारी रेल्वे आणि तिचा आवाज यांविषयी काहीही पत्ता लागत नाही आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात.
रेल्वेने प्रवास केला जातो तेव्हा ती फलाटाला लागते आणि फलाटाला लागून जिना असतो. तो सर्वांना दिसतही असतो, पण ते जिन्याच्या दहा ते पंधरा पायर्‍या ओलांडण्याचा आळस करतात. शॉर्टकटने आपला रस्ता गाठावा, असा विचार करतात.  वाहन चालवताना आपली जबाबदारी, नियमांचे पालन करणे, हॅल्मेट घालणे, ट्रिपल सीट वाहन न चालवणे, अरुंद रस्त्यावर ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी, गाडीचा वेग याबाबत वाहनचालकानेच काळजी घ्यायला हवी. काहीही झाले तर सर्व प्रकाराला सरकारी यंत्रणेला जबाबदार असते , आपली बेपर्वाईची मानसिकताही बदलावी लागेल व स्वत:ची सुरक्षा स्वत:ला करावी लागेल.

No comments:

Post a Comment