Monday, August 20, 2018

झोप आणि खोलवर श्‍वास


     आजच्या बदलत्या जीवनशैलीत झोपेचे अगदी खोबरे होऊन गेले आहे. आज माणूस फक्त पैसे छापण्याच्या मागे लागला आहे. जीवघेणी स्पर्धा त्याला स्वस्थ बसू देत नाही. साहजिकच झोप पळून गेली आहे. परवाच एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. संपूर्ण जगात झोपेच्या गोळ्यांचा व्यापार नऊ अब्ज डॉलरचा असल्याची ती बातमी होती. सर्व्हेक्षणानुसार जगातल्या 85 टक्के लोकांना गाढ झोप येत नाही. यातले 53 टक्के लोक सांगतात की, त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होतो. अमेरिकेसारख्या देशात तर झोप ही नैसर्गिक क्रियाच राहिलेली नाही. तो एक आजारच जडलेला आहे. रात्रीची झोप ही त्यांच्या सवयींवर अवलंबून आहे. जे लोक दिवसा कष्ट, मेहनत करत नाहीत, त्यांना रात्रीची झोप येत नाही. झोपेची समस्या मोठी गंभीर बनली आहे.

     आपण स्वत:कडे लक्ष देत नसल्याचा हा पुरावा आहे. फक्त काम आणि काम. खरे तर झोप व्यवस्थित होत नसेल तर माणसामध्ये उत्साह कसा निर्माण होणार? साहजिकच कामाच्या ठिकाणी त्याचा परिणाम होऊन आपली प्रतिमा मलीन होण्याचीच शक्यता आधिक आहे. शरीर स्वास्थ्य ठीक नसेल तर राबण्याला काय अर्थ आहे? बैल घाण्याला जुंपवल्यासारखा हा प्रकार आहे. अर्थात झोप चांगली यायला हवी, यासाठी कष्टाची आवश्यकता आहे. आपण केलेल्या अन्नग्रहणातून जी ऊर्जा तयार होते,ती मुरली पाहिजे, नाही तर मेद वाढत जातो. ही दुसरी समस्या त्यातून निर्माण होते. त्यातून लठ्ठपणा वाढला की, हळूहळू एक-एक आजार येऊन शरीराला चिकटतात. मग दवाखान्याचे हेलपाटे सुरू होतात आणि कमावलेला पैसा पुन्हा शरीरासाठी खर्च करावा लागतो. तेच जर शरीर स्वास्थ्य राखून काम केल्यास साठवलेली गंगाजळी म्हातारपणी सत्कारणी लागते. पण माणूस एक असा प्राणी आहे,त्याची हाव काही कमी होत नाही.
     झोपेचे खोबरे होऊ नये,म्हणून आपल्या आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रानात राबणार्या माणसाला अशा उपायांची गरज नसते. त्याची खरी गरज ही पांढरपेशा माणसाला अधिक आहे. दिवसभर बैठे काम करणार्याला याची आवश्यकता आहे. यासाठी आचार्य ओशोंनी एक साधा सरळ उपाय सांगितला आहे. खोलवर श्वास घेण्याचा उपाय. दिवसभर खोलवर श्वास घेत राहा. काम करताना, चालताना, बोलताना सातत्याने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे. जितका खोलवर श्वास घ्याल, तितका अधिक  प्राणवायू आत जाईल. याला हायपर ऑक्सिजनेशन असे म्हणतात. याचा परिणाम झोपेवर होतो. जर खोलवर श्वास घ्याल,तर झोपसुद्धा गाढ येईल. माणसे विचार करतात की, उशीरापर्यंंत झोपले म्हणजे चांगली झोप घेतली. पण झोपेचे गणित जरा उलटे आहे, ती जितकी गाढ असते,तितका त्याचा वेळ कमी होतो. झोपेची खरी गरज आहे, ती शरीराला आराम मिळावा यासाठी! ते एक यंत्र आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे.
     पण यासाठी म्हणजे झोपेची तयारी दिवसभर करावी लागते. ज्या झोपेनंतर तुम्हाला ताजेतवाना वाटते, ती खरी आरामशीर झोप. जर उठल्यानंतरही आपल्याला जडपणा येत असेल, आळस वाटत असेल तर ती झोप स्वस्थ नाही, असे समजायचे. आरामशीर झोप यायची असेल तर मन शांत असायला हवं. आजकालचे लोक मनाचा वापर अधिक करताना दिसतात. आणि शरीराचा वापर कमी. ही अस्वाभाविक परिस्थिती आहे. मनाला असे एखादे बटन आहे, जे आपल्या विचारांना बंद करू शकते आणि ते बटन म्हणजे खोलवर श्वास. या बटनाचा सतत वापर करा आणि छान झोप घ्या. दीर्घायुष्य जगा.

2 comments:

  1. आवडणारी माहिती दिली. आभारी आहे.

    ReplyDelete
  2. झोप ही विश्रांती, तजेलेपणाबरोबरच इतर अनेक लाभ देते, हे वैज्ञानिक प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. गाढ झोपेत शरीरात वृद्धीसंप्रेरके निर्माण होतात आणि त्यामुळे वार्धक्य दूर राहते. ‘डोपामाइन’ नावाचे संप्रेरक झोपेदरम्यान स्रवते, त्यामुळे वेदना कमी होतात. झोप वेदनाशामक आहे. दिवसभरातील शारीरिक, मानसिक, भावनिक ताण रात्रीच्या समाधानकारक झोपेनंतर दूर होतात, हे वैज्ञानिक सत्य प्रत्येकजण अनुभवतो. इंग्रजीत ‘स्लीपिंग ऑन अ प्रॉब्लेम’ हा वाक्प्रचार यथार्थ आहे. उत्तम झोपेमुळे स्मरणशक्ती शाबूत राहते, वाढते. वरील सर्व गुणधर्मामुळे आपले मानसिक, भावनिक स्वास्थ्य जोपासण्यात येते. अनेक संशोधनांती आढळले आहे की, अपूर्ण, असमाधानकारक झोपेमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, हृदयविकार इत्यादी विविध आजार होऊ शकतात. आपली झोप अतीव महत्त्वाची आहे, तिचा मनापासून स्वीकार व आदर करा आणि स्वास्थ्यपूर्ण, चिरतरुण आयुष्य मिळवा, हा संदेश आपल्या पूर्वजांपासून आधुनिक विज्ञानापर्यंत सांगितला गेला आहे.

    ReplyDelete