Tuesday, August 21, 2018

वर्तमानात जगा


     माणूस विचार करणारा प्राणी आहे. त्यामुळे सतत त्याच्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतो. माणसाला खरे तर भविष्याची काळजी अधिक सतावत असते. त्यामुळे तो सतत डोक्यात राख घालून घेऊन वावरत असतो. भविष्याची काळजी करत असताना तो प्रत्यक्षात भुतकाळातल्या घटनांशी चिकटून बसलेला असतो. साहजिकच त्याची प्रगती होताना दिसत नाही. कारण तो वर्तमानात जगतच नसतो. वास्तविक आपण मागचा-पुढचा विचार न करता वर्तमानात भरभरून जगलं पाहिजे. वर्तमान कसा जगला यावर भविष्य अवलंबून आहे. माणसाने गेलेल्या गोष्टी विसरून पुढे पुढे गेले पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पाणी. पाणी जोपर्यंत वाहत असते,तोपर्यंत ते स्वच्छ,निर्मळ, ताजे असते. ते एकाच ठिकाणी साठले म्हणजे मात्र त्याला दुर्गंधी यायला लागते. त्यात अपायकारक जीव-जंतू वाढायला लागतात. तसे स्वत:लाही चांगले, काही तरी खास बनवायचे असेल तर पुढे पुढे जात राहिले पाहिजे. वाटेत येणार्या समस्या, अडथळे दूर सारून स्वत:ला एक अनुभवसिद्ध बनवले पाहिजे.त्याचाच उपयोग आपल्या भावी जीवनात होत असतो.
   
 काही माणसे भुतकाळात यशस्वी झालेल्या महान व्यक्तींचे विचार आत्मसात करतात. पण असेही काही माणसे असतात की, ते भुतकाळातील लोकांमध्ये आणि भुतकाळात आपल्यासोबत घडलेल्या घटनांमध्येच हरवून जातात. अशी माणसे आजच्या संबंधीत गरजा, समस्या आणि त्याच्या जाणिवा यांची काळजी करताना दिसत नाहीत. खरे तर जुन्या-नव्या आणि भुत-वर्तमान यांची सांगड घालून आयुष्य जगायचे असते. त्यातून बोध घेऊन आपले आयुष्य यशस्वी बनवायचे असते. जर तुम्ही भुतकाळात आणि त्यातल्या घटनांमध्येच अडकून पडलात तर मात्र तुम्ही त्याचा विचार करून करून त्रासून जाणार. अशा लोकांना मग वर्तमानापेक्षा भविष्याचीच अधिक चिंता लागून राहिलेली असते. ही माणसे विचार करतात की, आपला वर्तमान कसाही असू दे,पण भविष्यकाळ मात्र जबरदस्त असला पाहिजे. पण त्यांना याची जाणीव नसते की, ते आपला वर्तमान योग्य प्रकारे जगत नाहीत,तिथे भविष्याची गॅरंटी कोण देणार? वर्तमानावरच भविष्य अवलंबून असते. 
     महात्मा गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, तुमचे भविष्य तुम्ही आज काय करताय, या गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे भूत आणि भविष्याची काळजी सोडून वर्तमान चांगल्या प्रकारे जगण्यासाठी कामाला लागा. हीच सुखद जाणीव आहे. जर तुम्ही आजचा उपयोग योग्य प्रकारे करू शकलात तर तुमचे भविष्यदेखील उज्ज्वल असणार आहे.
     वर्तमान चांगला बनवण्यासाठी आपण आपल्यापेक्षा मोठ्या किंवा महान व्यक्तींच्या भूतकाळातून काही शिकण्याची आवश्यकता नाही. जर शिकण्याची दृष्टी असेल तर आपण आपल्या वयाच्या छोट्या व्यक्तीकडूनदेखील शिकू शकतो. स्वत:ला उत्तम बनवण्यासाठी काही ऊर्जावान लोकांच्या भेटी घ्यायला हव्यात. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.  विशेष म्हणजे आपण आशावादी राहिले पाहिजे. आशा केल्याने जीवनात नव्या आशेचा संचार होतो.

1 comment: