Sunday, December 3, 2017

लक्ष्य कितीही कठीण असलं तरी घाबरून जाऊ नका

     भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणार्‍या राधिका मेनन यांना गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 21 तारखेला इंटरनॅशनल मरिटाईम ऑर्गनायझेशनने अ‍ॅवार्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अ‍ॅट सी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मासेमारांना मेनन यांनी जीवाची बाजी लावून वाचवले होते. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

     राधिका या केरळच्या कोदुनगलर क्षेत्रात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडसी आणि काही तरी करून दाखवण्याची हिम्मत हा त्यांच आ गुणविशेष होय.शाळेत असतानाच त्यांनी घरात सांगून टाकलं होतं की, मला शिक्षिका किंवा डॉक्टर व्हायचं नाही. मोकळ्या वेळेत नेहमी सागरी किनारी भटकणं,फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणार्‍या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागरी सफरीला जावं, असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्‍चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला.त्यांना वाटलं  होतं की, ही जोखमीची नोकरी आहे. त्यांची नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल? पण उत्तुंग इरादे असलेल्या राधिकांनी त्यांना यासाठी राजी केलं.
     पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. कॉलेज त्यांच्या घरापासून तीस किलोईटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहातल्या संवाद-प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फारच उत्साही होत्या.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरचीनोकरी मिळाली. आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टीफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं.पण त्या या रोमांचकारी प्रवासामुळं जाम खूश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना! आता त्यांचं लक्ष्य होतं, समुद्री जहाजाची कमान सांभाळायची.2012 साली हे त्यांचे स्वप्न पूर्ण झालं.राधिका या देशातल्या पहिल्या महिला नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या ङ्गसंपूर्ण स्वराज्यङ्घ या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली.
     या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधीलच एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवर्‍याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अडचणी आल्या,परंतु त्या त्याला घाबरल्या नाहीत. सगळ्यात कठीण गोष्ट होती, ती म्हणजे मुलाचा सांभाळ. दीर्घ काळ घरापासून लांब राहावं लाघायचं. राधिकांनी हे आव्हानदेखील चांगल्याप्रकारे निभावलं.राधिकांच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली.
गेल्या वर्षी एक घटना घडली. दिवस होता 22 जूनचा. रात्रीचे जवळपास आकरा वाजले होते.तेव्हा त्या संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या.जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रुप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकार्‍याने ओडिशाच्या गोपाळपूर तटाच्या जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर  मासेमारांची नाव लाटांच्या गर्देत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटीची लढाई लढत होते. अधिकार्‍याने तात्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली,मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे.त्यात असलेले मासेमार भयंकर अशा अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिनीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती.
     एक क्षणदेखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या पाच मिनिटात जहाजातले बचाव कार्यासाठी सज्ज झाले.मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की,त्यांना नावेपर्यंत जाताच येईना.बुडणार्‍या मासेमारांना माहित होतं की, त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.ते  जीवांचा आकांतानं स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जाणार्‍या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धुसर होत चालली आहे. जहाजातले कर्मचारी मात्र जोराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळं बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती.दुसरा प्रयत्न केला गेला. मासेमार जितक्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच वेगाने ते मागे ढकले जात होते.दुसरा प्रयत्नदेखील वाया गेला.
      सगळ्यांना वाटलं की, आता सगळं संपलं. त्यांना वाचवणं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचा हौसला तुटू दिला नाही. त्यांनी तिसर्‍यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की, त्यावेळी समुद्रात नऊ मीटरच्या उंचच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैलाने वाहत होता. मासेमारांना वाचवण्यासाठीचे आमचे दोन प्रयत्न फसले होते.पण आम्ही हिम्मत हारलो नाही.शेवटी तिसर्‍या प्रयत्नांना यश आलं.पायलट सिडीद्वारा मासेमार्‍यांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले.नावेतील सातही मासेमार सहिसलामत वाचले होते.वादळापासून बचावलेला पेरला चिन्नाराव याची लक्ष्मी म्हणाली की, आमचे पती कित्येक दिवसांपासून  घरी आले नाहीत, म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की, त्यांची नाव बुडाली.ाअम्हाला वाटलं, ते जिवंत राहिले नसतील.पण राधिका मॅडमंनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतश: आभारी आहे.
     या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मॅरीटाइम संस्थेने त्यांना वीरता पुरस्काराने सन्मानित केले.भारतीय नौसेनेची त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.राधिका सांगतात की, ज्यावेळेला आम्ही जहाजावर असतो, त्यावेळेला आम्ही महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही.कठीण लक्ष्य समोर असेल तर हिम्मत आपोआप येते.हे सगळे आमच्या टीमच्या धाडसामुळं शक्य झालं.

No comments:

Post a Comment