Wednesday, October 4, 2017

प्रशासकीय सेवेत का यायचे?

     अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाणार्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या स्पर्धा देणार्यांची संख्याही कमालीची वाढली आहे.यातून क्लासेसवाल्यांची दुकानदारी तर मस्त चालली आहे.पण जी मुलं अथवा मुली स्पर्धा परीक्षा देण्याकडे वळली आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र बर्याचदा अंधानुकरण होत असल्याचे दिसत आहे. कुठलेही ध्येय-धोरणे निश्चित न करता मला अधिकारी व्हायचं आहे, असे म्हणून ही मंडळी स्पर्धा परीक्षांच्या मागे लागली आहेत. भारतीय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत कशासाठी जायचे,याचे उत्तर यांच्याकडे नाही.या ठिकाणी मान-सन्मान मिळतो आणि महत्त्वाचे म्हणजे भरपूर पगारासह अन्य मार्गाने अर्थात भ्रष्ट मार्गाने रग्गड पैसा मिळतो,हीच लालसा त्यामगे अधिक दिसत आहे. अर्थात सगळेच असे करत नाहीत. काहींची भूमिका ठाम आहे. त्यांना आपल्याला प्रशासकीय सेवेत का जायचे आहे, याचे सकारात्मक आणि ठाम उत्तर आहे.मात्र अशी मुलं फारच थोडी आहेत.
     प्रशासकीय अधिकार्याने मनात आणले तर बर्याच गोष्टी बदलू शकतो.याची आपल्या समाजात खूप उदाहरणे आहेत. अशा लोकांची आता गाथाच ऐकायला मिळत आहे. काही लोकांनी तर यातून नवाच बिझनेस सुरू केला आहे. जागोजागी व्याख्यानांना जाऊन त्यांनी आपले मानधन रुपाने खिसे भरायला सुरुवात केली आहे. काहींनी आपल्या आयुष्याच्या संघर्षाची कथा पुस्तकरुपाने मांडून त्यातूनही पैसा छापायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांना याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र देशसेवा, समाजसेवा याचा विचार प्रामाणिकपणे होणार आहे की नाही? एवढे मात्र खरे की, एकदा का तुम्ही त्या पदावर पोहचलात ई,मग मागे वळून पाहण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने सहज धन-दौलत,संपत्ती वैगेरे मिळत राहते.पण त्याच्यापुढे आपण विचार करणार आहोत की नाही? खरोखरच काही तरुणांना किंवा जे सध्या सेवेत आहेत,त्यांना समाज,देशाची काळजी आहे. संपूर्ण समाजावर परिणाम होईल असा निर्णय घेण्यासाठी किंवा अशा एखाद्या निर्णय प्रक्रियेचा भाग होण्यासाठी आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचे आहे किंवा आलो आहे, अशी म्हणणारी आणि तसं वागणारी माणसं आहेत. बोले तैसा चाले।त्याची वंदावी पाऊले॥ असे म्हटले आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त किंवा सचिव ही पदे फार मोठे अधिकार असलेली असतात.त्या अधिकारांचा वापर कशासाठी करता हे फार महत्त्वाचे आहे. काही पोलिस अधिकार्यांनी अवैध धंदे बंद केले,काहींनी बालविवाह रोखले तर काहींनी प्रशासन अगदी स्वच्छ केले. मग ते स्वच्छतेत असेल किंवा भ्रष्टतेत असेल. कायद्याचा वापर कसा,कुठे करायचा याचे ज्ञान असल्यास फार चांगली कामे होऊ शकतात. समाज बदलण्यास मदत होते.
     काहीजण सांगतात, वेगवेगळे प्रसंग अशा महत्त्वाच्या पदावर असताना अनुभवावयास मिळतात. अशा प्रसंगी स्वत:च्या सर्व संवेदना जागृत ठेवून काम करावे लागते. कार्यालयीन कामकाज करताना वेगळी परिस्थिती असते. त्या वेळी कामाची म्हणोन एक पद्धत बसलेली असते. त्याचे नियम असतात. त्याचे पालन केले तरी कामे व्यवस्थित होतात. पण काहीजण तसे करत नाहीत.त्यामुळे कामे होत नाहीत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. असे नाही केले तर सिस्टीममधील दोष वाढत जातात.त्यामुळे कार्यालयीन कामे करताना काही गोष्टी निश्चित केल्या पाहिजेत.
     इथे काम करतील त्याला उत्तेजन व नाही करणार त्यांना शिक्षा हे सूत्र उपयोगाला पडते.आपल्याला कशापद्धतीने काम करायचे आहे आणि काय साध्य करायचे आहे, याचे भान आपल्या हाताखालील लोकांना यायला हवे आहे. त्यांना आपला हेतू स्पष्ट करून सांगितला पाहिजे. सिस्टीम बदलताना त्रास होतो. मात्र अधिकार्यांनी ठरवले तर यात बदल होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण या सेवेत येताना समाज आणि देशसेवा हे निश्चित केले आहे, त्यादृष्टीने किंवा त्या दिशेने वाटचाल चालू राहायला पाहिजे.दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाले पाहिजे, असे फक्त म्हणून चालत नाही तर त्या दिशेने आपण स्वत: कृती करणे महत्त्वाचे असते. आणि तसे केल्यावर तुमच्या सहकार्यांना तुमच्याबरोबर यावेच लागते, नव्हे सहकारी येतातच.
     मनात सकारात्मक आणि चांगली भूमिका ठेवून या क्षेत्रात आल्यास त्याचा आपल्या देशाला आणि समाजाला चांगला उपयोग होणार आहे.प्रशासन अधिकारी हे पद जितके मानाचे आहे,तितकेच ते जोखीमचे आहे. आज या पदावरची माणसे लाच घेताना सापडतात तेव्हा फार वाईट वाटते. असे वाढत राहिले तर लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही. भ्रष्टाचार बोकाळला तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment