Sunday, October 15, 2017

आ बैल मुझे मार

     राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ काही संपता संपेना.या बदल्यांना सातत्याने आव्हान देणार्या शिक्षक आणि शिक्षकांच्या संघटनांमुळे त्यांचा हा प्रतापच अंगलट आला आहे. शासन 12/9 च्या शासन आदेशानुसार फक्त 1,2 आणि 3 संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या करणार होते. ही संख्या जिल्हावार फारच कमी होती. सांगली जिल्ह्यातला हा आकडा जेमतेम अडीचशे-तीनशेच्या आसपास होता. पण शिक्षक आणि त्यांच्या संघटनांनी हा संवर्ग 4 वर अन्याय आहे, असे म्हणत न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने शिक्षकांचे म्हणणे योग्य मानून शासनाने नंतर काढलेला 12/9 चा जीआर रद्द केला आणि 27/2 च्या जीआरनुसार बदल्या करण्यास हिरवा कंदील दिला.त्यामुळे आता 1 ते 4 या सर्व संवर्गाच्या बदल्या होणार असून आता सगळ्यांनाच बदलीचा फॉर्म भरावा लागणार आहे आणि 10 वर्षे सेवा ज्यांची झाली आहे,त्या सगळ्यांनाच बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शासनही यामुळे इरेला पेटले असून त्याने लगेच बदली पोर्टलवर बदलीचा फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत या पोर्टलवर शिक्षकांना फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना दिवाळीचा फराळ गोड लागणार नाही. आता शिक्षक न्यायालयात गेलेल्या शिक्षक आणि त्यांच्या संघटनांच्या नावाने बोटे मोडू लागली आहेत. संवर्ग 4 मध्ये शिक्षकांचा मोठा भरणा आहे. जवळजवळ 80 टक्के शिक्षकांना आता या बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
     शासनाने राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार आपल्या हातात घेत यावर्षी नव्या नियमानुसार बदल्या करणार होते. ज्या जिल्ह्यात 10 वर्षे सेवा झाली आहे, असे शिक्षक या बदल्यांना पात्र होते. अर्थात या बदल्या कशा होणार याची आयडिया ना शिक्षकांना होत्या ना शिक्षक संघटनांना! मात्र तरीही शिक्षकांच्या संघटनांनी या बदल्यांना होकार दिला होता. शासनानेही एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्यांची मोहीम हाती घेताना पूर्वानुभव कसलाच नसताना ऑनलाइन घोळ घालून ठेवला.त्यांच्या सॉफ्टवेअर दुरुस्तीच्या भानगडीत त्यांना बदल्या करायला विलंब व्हायला लागलाच शिवाय शिक्षक आणि शिक्षकांच्या संघटना या बदल्या होऊ नयेत म्हणून प्रयत्न करून लागले. त्यामुळे या बदल्यांना वारंवार स्थगिती येऊ लागली. या सगळ्या प्रकारात पहिले शैक्षणिक सत्र संपले.पण बदल्यांची प्रक्रिया काही संपली नाही.
     बदल्यांना विलंब झाल्यामुळे शासन काही थोड्या शिक्षकांच्याच बदल्या करणार होते. मात्र शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी संवर्ग 4 मधील शिक्षकांवर अन्याय होतोय, असा मुद्दा उपस्थित करत 12/9 च्या आदेशाला आव्हान दिले. न्यायालयाने ते मान्य करत 27/2 नुसार बदल्या करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता सगळेच शिक्षक बदली प्रक्रियेत आले आहेत. करायला गेलो एक आणि झाले एक अशी अवस्था शिक्षक संघटनांची झाली आहे. (संकेत टाइम्ससंपादकीय)

No comments:

Post a Comment