Sunday, November 12, 2017

(बालकथा) हुशार गुलाम

     ही गोष्ट त्या काळातली आहे, ज्या काळात इराकमध्ये गुलाम प्रथा प्रचलित होती. या प्रथेनुसार गरीब व्यक्ती श्रीमंतांचे गुलाम बनून त्यांच्याजवळ राहत. त्याकाळात गुलामांचा व्यापारदेखील व्हायचा, जसा आज जनावरांचा होतो तसा.जर एकाद्याला काही कारणामुळे गुलाम नको असेल तर तो त्याला बाजारात नेऊन विकायचा.
अलीसुद्धा असाच एक गुलाम होता. तो मोठा मेहनती आणि धट्टाकट्टा होता. तो कित्येकदा तरी विकला गेला होता. यावेळेलादेखील पुन्हा एकदा त्याला विकायसाठी बाजारात आणले होते. एक श्रीमंत शेख इब्न-बिन-सऊद बाजारात एका चांगल्या गुलामाच्या शोधात फिरत होता. त्याची दृष्टी धट्ट्याकट्ट्या अलीवर पडली. त्याला आपल्या घरासाठी अशाच एका गुलामाची गरज होती. त्याने अलीला योग्य किंमत देऊन विकत घेतले. त्याला घेऊन तो आपल्या घराकडे निघाला.

वाटेत अलीला त्याचा नवा मालक शेख इब्न-बिन- सऊदने विचारले, “ तू तुझ्या मालकाजवळ पहिल्यांदाच गुलामी करत होतास का?”
अली शेखला म्हणाला, “ नाही मालक, आता मला सातव्यांदा विकण्यात आले आहे. ”
यावर शेख त्याच्याकडे चकीत होऊन पाहायला लागला. मग म्हणाला, “ म्हणजे तू कामचोर आहेस. इतक्या वेळेला तुला विकलं आणि खरेदी केलंय ,म्हटल्यावर असेच असणार! ”
अली म्हणाला, “ नाही मालक, असं काही नाही. मी कामचोर तर अजिबात नाही. माझ्या कामाच्याबाबतीत कुणीच अशी तक्रार केली नाही. ”
हे ऐकल्यावर शेख ओरडून म्हणाला, “ असे असेल तर मग तुला सारखे सारखे विकले का गेले? ”
यावर अली काहीसा विचार करत म्हणाला, “ काही खास नाही मालक, पण माझ्याकडे एक अवगुण आहे. मी वर्षातून एकदा खोटे बोलतो. ”
हे ऐकून शेख पुन्हा चकीत झाला. तो म्हणाला, “ यात काय एवढं? माणसं दिवसांतून कितीदा तरी खोटे बोलतात आणि तू तर वर्षातून एकदा खोटे बोलतोस. माझ्याजवळ तर जवळजवळ असेच गुलाम आहेत, पण मी त्यांना या एवढ्याशा गोष्टींवरून कधी विकले नाही. ”
अली म्हणाला. “ शेख साब, माझे वर्षातून एकदा बोललेले खोटे सगळ्या खोटेपणावर भारी पडते. तुम्हीदेखील वर्षातून एकदा  बोलले खोटे सहन करू शकणार नाही. ”
 हे ऐकून शेख म्हणाला, “ मी तुझे एक खोटे पचवीन. आणि नाही पचवले तर मी तुला या गुलामगिरीतून मुक्त करीन. ”
हे ऐकून अलीची कळी खुलली. दिवस जात होते.शेवटी एक वर्ष होत आले. आता अलीची खोटे बोलण्याची वेळ आली होती.
एक दिवस शेख अलीला घेऊन गोडावूनला गेला. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की, आपण घरातली तिजोरी उघडीच ठेवून आलो आहे.ङ्घ आता अली त्याचा विश्वासू गुलाम बनला होता.तो अलीला म्हणाला, “ जा, घरी जाऊन बघून ये की, तिजोरी उघडी आहे का?” मालकाच्या आदेशानुसार अली घरी जायला निघाला. आता त्याच्या मनात या गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा जागी झाली. त्याने वाटेतच आपले सगळे कपडे फाडले आणि तिथेच आपली छाती बडवून घेत मोठमोठ्याने रडू लागला.येणारी-जाणारी माणसे त्याची ही अवस्था पाहून त्याच्याजवळ थांबू लागले आणि कारण विचारू लागले. तो म्हणाला, “ आता आताच माझे मालक शेख इब्न-बिन- सऊद अल्लाला प्यारे झाले.ते फार चांगले होते. ”
शेखचे त्या नगरीत वजन होते.जवळपास सगळेच त्याला ओळखत होते. अचानक ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. वाईट वाटले. बघता बघता ही बातमी आगीप्रमाणे नगरीत पसरली.
अली गर्दीत ही बातमी पसरवून सगळ्यांचा डोळा चुकवून आपल्या मालकीणकडे आला. तिथे आल्यावर त्याने आपले डोके आपटायला आणि धाय मोकलून रडायला सुरूवात केली. मालकिणीने विचारले,“ काय झाल? असा का कुणाचा जीव गेल्यासारखा रडतोयस?”  अली रडत रडतच म्हणाला, “ मालकिण, मालक गोडावूनमधल्या चौकीवर बसून पोती मोजत होते.अचानक पोती त्यांच्यावर कोसळली आणि त्यात त्यांचा जीव गेला.”  हे ऐकून मालकिणबाईंना मोठा धक्का बसला.त्याही मोठमोठ्याने रडायला लागल्या. आदळ-आपट करून घ्यायला लागल्या.बर्याच उशिराने रडून-बिडून झाल्यावर मालकीण सावरल्या. त्या अलीला म्हणाल्या, “ चल, आता त्यांना दफणायची तयारी करायला हवी. तू त्यांचा मृतदेह कब्रस्तानमध्ये घेऊन ये. ”
अली रडत-खडतच गोडावूनच्या दिशेने परतला. इकडे शेख अलीची अशी अवस्था पाहून म्हणाला, “ अरे अली,काय झाल? सगळं ठीक तर आहे ना? इथून तर तू अगदी चांगला गेला होतास. ”
अली रडत म्हणाला, “मालक काय सांगू? घराला आग लागली होती. त्यात मालकीण  जळून खाक झाल्या. दरोडेखोरांनी तिजोरी लूटून नेली. जाताना त्यांनी घराला आग लावली. ”
हे ऐकून मालकादेखील जबर धक्का बसला. तोही मोठमोठ्याने रडायला लागला. मग काही वेळाने तो म्हणाला, “चल, घरी जाऊ.” हे ऐकून अली म्हणाला, “ शेखसाब, मालकिणबाईंना कब्रस्तानला पाठवलं आहे. तिथे सगळे तुमचीच वाट पाहात आहेत. ”
हे ऐकून शेख रडत रडतच कब्रस्तानात पोहचला.तिथे मालकीण उभी होती. तिला पाहिल्यावरतो  भूत समजून  पळून जाऊ लागला. मालकीणदेखील मालकाला जिवंत पाहून घाबरली. दोघेही एकमेकाला पाहून भलतेच घाबरून घट्ट झाले.
तेव्हा मालकीण म्हणाली, “ अली तर म्हणाला की, तुम्ही पोत्यांखाली दबून मेलात म्हणून...? ”
शेख म्हणाला, “ याने मलादेखील हेच सांगितले की, तू आगीत जळून राख झालीस म्हणून... ”
आता शेख अलीकडे वळला आणि संतापाने लालेलाल होऊन ओरडू लागला, “ हे काय केलेस तू? आज मी तुला जिवंत सोडणार नाही. “  असे म्हणत तो अलीच्या धावून अंगावर जाऊ लागला. हे ऐकून अली हसून म्हणाला, “ मालक, तुम्ही तुमच्या वचनापासून दूर जात आहात. तुम्हीच म्हणाला होतात की, माझे एक खोटे पचवाल म्हणून आणि नाही पचवलात तर माझी या गुलामगिरीतून मुक्तता करीन. आता तुम्ही माझे खोटे सहन करा किंवा मला मुक्त करा. हां,पण एवढे लक्षात ठेवा की, जर तुम्ही हा माझा खोटेपणा सहन केला तर पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला अशाच खोट्या बोलण्याला सामोरे जावे लागेल. ”
हे ऐकून शेखची बोबडीच वळली. तो कसा तरी ओरडून म्हणाला, “ अरे, जा बाबा जा... तुझं तोंड काळं कर एकदा. मी तुला आजपासून मुक्त केलं.”  अशाप्रकारे अली आपल्या बुद्धीचातुर्याने गुलामी जीवनातून मुक्त झाला आणि आपले  स्वतंत्र आयुष्य जगू लागला.

No comments:

Post a Comment