Monday, November 27, 2017

मुलांचे आयुष्य धोक्यात घालू नका

     आज सतत पूर्वीच्या काळातील माणसे आणि आताच्या काळातील माणसे यांच्यात विविध कारणाने तुलना केली जाते. जुनी माणसे तर आमच्या काळात असे होते, तसे होते सांगताना थकत नाहीत.कारण त्यांना आजच्या पिढीचे वागणे,बोलणे पचवताना जड जात आहे. त्यामुळे त्यांची सतत चीडचीड दिसून येते. मात्र त्यांचे काही चालतच नाही. त्यामुळे त्यांना शेवटी आपले तोंड बंदच करावे लागते. वास्तविक सध्याच्या काळात दळवळणाची साधने वाढली आहेत. पूर्वी स्वयंपाक करायला, धुणी-भांडी करायला जे कष्ट पडत आहेत, ते नव्या साधनांनी कमी झाले आहे. दारात वाहने आली असल्याने थोडक्या कालावधीत पाहिजे तिथे जाता येते. म्हणजे लोकांची कामे पटापट होत आहेत. असे असले तरी माणसांना  असलेले सुख  उपभोगता येईना, अशी परिस्थिती आहे.कारण तो अधिकच पैशाच्या मागे लागला आहे. रोजच्या जीवनाचा खर्चदेखील वाढला असल्यामुळे माणूस मिळालेल्या सुख साधनांचा त्याग करत सतत धावपळ करत आहे. त्याची जीवनशैली बदलली आहे. कोण रात्रभर काम करतो तर कोण दिवसभर. या धावपळीत आपल्या मुलांकडे आणि स्वत:कडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. साहजिकच त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आणि त्यामुळेच जुनी माणसे आजच्या पिढीवर राग काढत आहे.

     जीवनशैलीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलामुळे लोकांच्या शरिरावर आणि मनावर अनेक व्याधींनी कब्जा केला आहे. कारण त्यांना रोजच्या धावपळीत व्यायम करायला वेळच नाही. आधुनिक तंत्रज्ञान अवतरल्याने बहुतांश कष्टाची कामे कमी झाली आहे. त्यामुळे कष्ट कमी झाल्याने ऊर्जा खर्च होत नाही. ती साठून अनेक रोग, आजार त्यांना चिकटत आहेत. यशासाठी धडपणार्या लोकांना अपयश येऊ लागल्याने माणसे डिप्रेशनमध्ये जात आहे. वास्तविक पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारायचा असतो आणि पुन्हा नेटाने कामाला लागायचे असते, हे सांगायला आणि ऐकून घ्यायला कुणाला वेळच नाही. त्यामुळे नवनवे आजार लोकांना होऊ लागले आहेत. शरीराला व्यायाम आणि मनाला शांती मिळत नसल्याने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊन लोक आत्महत्यासारख्या टोकाच्या निर्णयाकडे जात असल्याचे दिसत आहे. मुलांकडे आई-बाबांचे लक्ष नसल्याने मुलेदेखील अनेक वाईट गोष्टींना कवटाळून घेत आहेत आणि त्यात वाहवत जात आहेत. कामानिमित्त आई-बाबा बाहेर जात असल्याने आणि फ्लॅटसंस्कृती वाढत चालल्याने खेळ कमी झाला आहे. घरातच संगणक,लॅपटॉपवर गेम खेळणे आणि टीव्ही पाहात राहणे अशा गोष्टीत मुले गुंतून पडत आहेत. ती एकलकोंडी होत असल्याने त्यांनाही अगदी लहान वयात विविध आजार आणि सवयी जडू लागल्या आहेत. लहानापासून थोरापर्यंत सगळीच या बदलत्या जीवनशैलीच्या आहारी गेले आहेत.
      पूर्वीच्या काळी मोठया कष्टाची कामे करणार्या व्यक्तींना वेगळ्यावेगळ्या व्यायामाची गरजच भासत नसे. अर्थात त्यांना कराव्या लागणार्या कष्टामुळे त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी वेळच नसे, हा भागही तितकाच महत्त्वाचा आहे, पण नवनवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आल्यावर दैनंदिन जीवनातही त्याचा वापर वाढला. त्यामुळे वेळेबरोबर कष्ट वाचू लागले. परिणामी कष्टाच्या कामामुळे शरीराला मिळणारा व्यायाम कमी झाला. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी वेगळे उपाय करणे क्रमप्राप्त झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे संपूर्ण जीवनाचा ढाचाच बदलून गेला आहे. त्यामुळे विविध आजारांना आपोआपच निमंत्रण मिळायला लागले आहे. ही बाब खरी असली तरी आई-बाबांनी थोडे थांबून विचार करायला हवा. मोठ्या लोकांचे ऐकायला हवे. आपल्यासारखी धावपळ आणि शारीरिक,मानसिक वेदना, पिढा होऊ नयेत,यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुढच्या पिढीला कष्ट होऊन नये म्हणून माणसे आपले बहुमोल असे आयुष्य धोक्यात घालत आहेत. हे करताना माणसे स्वत:चे नुकसान तर करून घेत आहेतच शिवाय पाल्याचेही नुकसान करत आहेत.
      घरात पैसा असेल तर मुले काम करणार नाहीत, अभ्यास करणार नाहीत, उलट ती ऐतखाऊ होतील.याचा त्यांच्या आयुष्यात संघर्ष घडला पाहिजे. माणूस म्हणून त्याच्याही वाट्याला तुम्हाला ज्या वाट्याला आल्या त्या त्यांच्याही वाट्याला यायला हव्यात. माणसाला काही कामच नसेल तर आणि त्याची सवय नसेल तर ती काय करू शकणार आहेत. कित्येक मोठ्या यशस्वी उद्योजकांची मुले आपल्या आयुष्यात अपयशी झाली आहेत. त्याला कारण त्यांचे आई-वडील जबाबदार आहेत. आपल्यासारखे कष्ट त्यांना करायला लागू नये म्हणणार्या पालकांना मुलांच्या भावी आयुष्यात काय घडणार याची आपल्यावरून कल्पना यायला हवीभावी पिढीचे शारीरिक,मानसिक नुकसान होऊ नये, यासाठी आतापासूनच लोकांनी काळजी घ्यायला हवी.
     एक सजग पालक म्हणून काही तत्त्वांचे पालन आपण आपल्या मुलांसाठी करायला हवे. शालेय वयात मुलांची योग्य रीतीने शारीरिक, मानसिक तसेच भावनिक वाढ होणे आवश्यक असते. वाढत्या वयानुसार वजन व उंचीमध्येही योग्य वाढ होणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींसाठी शरीराची योग्य हालचाल होणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे वजन तसेच उंचीचे संतुलन राखले जाते. असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
   
 अलीकडे बदललेल्या जीवनशैलीनुसार वाढत्या वयातच मुलांची शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे. त्यामुळे हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. मुलांनी दररोज किमान एक तास व्यायाम करणे अथवा घराबाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे, पण शरीराची ही गरज आज पुरवली जात नाही. वाढत्या वयातील मुलांची जीवनशैली दिवसेंदिवस अधिकाधिक बैठी होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे त्याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा. मुले एकदा शाळेत जायला लागली की, मग शालेय विषयांबरोबरच निरनिराळ्या विषयांच्या शिकवण्यांच्या गराड्यात ती हरवून जातात. त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षकांच्या व पालकांच्या अभ्यासाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांचा अधिक वेळ जातो. त्यामुळे मुलांना खेळायला तसेच बागडायला वेळच उरत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्यामुळे किंवा भ्रमणध्वनी, संगणकावर खेळल्यामुळे सकाळी लवकर उठता येत नाही. त्यामुळे सकाळी व्यायाम करण्याची वेळ निघून गेलेली असते. तसेच संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मुलांना पुन्हा शिकवणीला जायला लागते. त्यानंतर टीव्हीवर कार्टून बघण्यात वेळ जातो. त्यामुळे मैदानी खेळ खेळता येत नाही. परिणामी शरीराला व्यायामही मिळत नाही. असे अनेक दिवस झाल्यास त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. काहीजणांचा लठ्ठपणा वाढतो.
    वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मुलांच्या जीवनावर होत आहे, तर मुलांच्या काही गोष्टी शहरी जगण्याशी जोडलेल्या आहेत. मुलांना खेळायची इच्छा असेल तरीही ते रहात असलेल्या इमारतीच्या आवारात खेळायला मोकळी जागाच नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. अशी स्थिती आज अनेक शहरात आहे. त्यामुळे परिसरातील जागेची कमतरता मुलांच्या मनावर परिणाम करते. तसेच त्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम करते.
     शाळेत जाणार्या मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांना तंदुरुस्त राहता येईल. मुलांनी शाळेत चालत किंवा सायकलवरून गेल्यास त्याचा फायदा त्यांना निश्चितच होईल. जागेअभावी खेळता येत नसलेल्या मुलांना पालकांनी कराटे, बॉक्सिंग, स्वीमिंग, टेनिस अशा खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त करावे. या खेळामुळे मुलांच्या शरीराला सर्वांगसुंदर असा व्यायाम मिळेल. तसेच त्याचा फायदा पुढील आयुष्यात त्यांना होईल. लहान वयामध्ये मुलांना नवीन खेळ व छंद जोपासणे सोपे जाते. त्यामुळे त्यांना तसे वातावरण तयार करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर एकाग्रता वाढविणारे खेळ खेळण्यास मुलांना पालकांनी सुचवावे. नेमबाजी, पतंग उडविणे यासारख्या खेळांचा समावेश यामध्ये करता येईल. अगदी घरातल्या घरात दोरीच्या उड्या मारल्यामुळेही शरीराला चांगला व्यायाम मिळतो. पालकांनी याबाबतीत वेळीच सावध व्हायला हवे.

No comments:

Post a Comment