Saturday, July 28, 2018

(बालकथा) वरदान


     बिहार राज्याच्या प्रेतशिला प्रदेशात गयासुर नावाचा एक दैत्य राहात होता. गयासुर अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता. तो ज्याला कुणाला पकडायचा,त्याला मारून टाकायचा. हजारो लोकांना त्याने आपल्या क्रुरतेचा बळी बनविला होता.
एके रात्री त्याने एक स्वप्न पाहिले. कोणी तरी त्याला सांगत होतं की, अशा प्रकारे कोणाची हत्या करणं पाप आहे. याचे फळ तुला भोगावेच लागणार.

     त्याचा परिणाम राक्षसावर झाला. तो पाप या शब्दालाच फार घाबरून गेला. मग काय! त्या दिवसापासूनच त्याचे जीवन पार बदलून गेले. त्याने वाईट कामांना तिलांजली दिली. जंगलात जाऊन तो भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होऊन गेला. मोठी कठोर तपस्या करू लागला.
तहान-भूक विसरून गयासुरने शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्याच्या या तपाने देव-देवतांचे सिंहासन डळमळीत झाले. त्यांनी त्याची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला,पण त्यात त्यांना यश आले नाही. आता त्यांना मोठी चिंता सतावू लागली. जर भगवान विष्णूने गयासुरला वरदान दिले तर, त्याला मारणे कठीण जाईल.हा आपल्याला सुखाने जगू देणार नाही. इंद्राला त्यांनी गयासुराचा तप भंग करण्याची विनंती केली. इंद्राने आपल्या दरबारातल्या सुंदर सुंदर अप्सरा गयासुराजवळ पाठवल्या. पण अप्सरादेखील त्याची तपश्चर्या भंग करू शकल्या नाहीत. यामुळे देवलोक तोंडावर आपटले. यामुळे ते आणखीच बिथरले.
     शेवटी सर्व देवतांनी हार पत्करली आणि ते ब्रम्हदेवाकडे गेले. म्हणाले, “महाराज, आता तुम्हीच आमचे रक्षण करू शकता. तुम्हीच गयासुरकडे जा. त्याची तपश्चर्या खंडित करा.”
     देवतांची चिंता पाहून नाइलाजास्तव ब्रम्हदेवांना त्याच्याकडे जावे लागले. परंतु, गयासुर तपस्येत इतका गढून गेला होता की,ब्रम्हदेव त्याच्याकडे जाऊन त्याचा तप भंग पावला नाही.ब्रम्हदेव गयासुरला म्हणाले,“ भक्ता, खूप झाले. तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर मागायचा आहे तो माग.”
मला वर-बीर काही नको. तुम्ही मला भगवान विष्णूचे ध्यान करायला द्या, एवढेच.” गयासुर म्हणाला.
     ब्रम्हदेवदेखील रिकाम्या हाताने परतले. मग सर्व देवतांनी आपसात चर्चा केली. ते शेवटी भगवान शंकराला घेऊन गयासुराकडे गेले. ते म्हणाले,“ भगवान विष्णूच्या उपासनेसाठी आम्हाला एक यज्ञ करावयाचा आहे. यज्ञासाठी कुठेच योग्य असे स्थान मिळत नाही. यासाठी तुझे विशाल शरीरच योग्य आहे. तू संमती दिलीस तर आम्ही तुझ्या शरीरावर यज्ञकुंड बनवून यज्ञ करू.”
हे ऐकून गयासुर हसला. म्हणाला, “मी माझे शरीर भगवान विष्णूला अर्पण केले आहे. त्यांचा यज्ञ जर माझ्या शरीरावर होणार असेल तर यापेक्षा आणखी कोणते असे मोठे भाग्य माझ्यासाठी असणार आहे.”
     देवतांना आनंद झाला. त्यांनी गयासुराच्या पाठीवर यज्ञकुंड मांडले आणि यज्ञ करविला. यज्ञाच्या आगीतून भगवान विष्णू प्रकट झाले.  ते गयासुरला म्हणाले,“ भक्तराजा, तू दैत्यरुपात जे म्हणून काही पाप केले आहेस, त्याचे प्रायश्चित पूर्ण झाले आहे. आता तू पुण्याचा अधिकारी बनला आहेस. मी तुझ्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न आहे. माग, तुला कोणता वर मागायचा आहे,तो वर माग.”
प्रभू,मी तुमचा भक्त आहे. तुमच्या दर्शनाशिवाय मला आणखी काय हवं? मला मोक्ष नको आहे, कारण मी माझ्या आयुष्यात खूप लोकांचे प्राण घेतले आहेत. हजारो आत्म्यांना कष्ट दिले आहेत. माझी इच्छा आहे की, आता या अतृप्त आत्म्यांना शांतता प्रदान करावी.”
     विष्णू भगवान म्हणाले,“गयासुर, मी तुला असा वर देतो की, तुझ्या या क्षेत्रात कोणीही मृत्यू पावल्यास किंवा कोणा मरणार्याचे पिंडदान झाल्यास, त्याला लागलीच मुक्ती मिळेल. हे क्षेत्र गयाया तुझ्या नावाने ओळखले जाईल. सर्व धार्मिक लोकांना याचा परिचय होईल.”
गयासुराच्या शरीरावर भगवान विष्णूच्या चरणाचे ठसे उमटले. फल्गू नदीच्या पावन काठावर विष्णूपादनावाचे मंदिर उभारले गेले. गयासुराला भगवान विष्णूचे दर्शन मिळाले होते. त्याने आपले शरीर सोडले. तो भगवान रुपात सामावला गेला.
     ‘विष्णूपादमंदिराचे महत्त्व संपूर्ण जगात आहे. भारताशिवाय मॉरिशस, सुरिनाम,केनया,मलेशिया,इंडोनेशिया, नेपाळ आदी देशांमध्येदेखील विष्णूपादमंदिरे आहेत. पण गयाचे एक आपले महत्त्व आहे. हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी जातात. तिथे आपल्या पितृलोकांच्या नावावर पिंडदान, श्राद्ध करून त्यांना मुक्ती देतात.

No comments:

Post a Comment