Sunday, July 1, 2018

उद्याची काळजी कशाला?


     मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात अवघड काम कोणते आहे, याची कल्पना आहे का? नसेल तर जाणून घ्या. जे काल करू शकला नाही, ते तुमच्यासाठी अवघड काम आहे, हे लक्षात ठेवा. कोणतेही काम वेळच्यावेळी करायला हवे. एकादे काम पेंडिंग पडले तर ते दुसर्या दिवसासाठी ओझे राहते. अशा प्रकारे कामाचा ढीग वाढत गेला तर तुमच्यासाठी ते आणखी अवघड काम होऊन जाईल. त्यामुळे कामे वेळच्यावेळी करायला शिका. आपल्या यश मिळवायचे असेल तर वर्तमानाकडे लक्ष द्यायला हवे.त्याची काळजी घ्यायला हवी.कारण असे केलात तरच भविष्य तुमची काळजी करणार आहे.

     वेळेचा सदुपयोग करायला शिका. वेळ वाया घालवू नका, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. कारण त्यातच आपले भविष्य दडलेले आहे. तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल तर आजच्या दिवसाचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे. कारण आजच्यामधूनच उद्याचा सोनेरी दिवस उगवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजून घेऊ शकतो, पण येणार्या काळावर लक्ष ठेवून आपण आपले आयुष्य व्यवस्थितरित्या जगू शकतो.
     कुणीतरी म्हटलं आहे पहा, कधीही कालची किंवा उद्याची काळजी करू नका. विचार केल्याने कालच्या दिवसापासून आपल्याला काहीच पदरात पडत नाही. तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची आपल्याला काहीच कल्पना नसते. त्यामुळे जो क्षण जगत आहात, त्या वर्तमानाची तेवढी काळजी करा. एक मात्र यातून शिकले पाहिजे, ते म्हणजे भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका आणि उद्याच्या काळजीची भीती याच्या विचारात तुम्ही आपला आजचा दिवस वाया घालवू नका.
     आपले भविष्य सुधारण्यासाठी आपण आपल्या भूतकाळापासून धडा घ्यायला हवा, कारण भूतकाळ हाच आपला सर्वश्रेष्ठ शिक्षक असतो. कोणत्याही दु:ख आणि भीतीशिवाय तुम्ही तुमचा भूतकाळ आणि भविष्य याचा विचार करीत असता तेव्हाच तुम्ही यशाच्या मार्गावर असता. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आपल्या उद्याच्या विकासासाठी विचारपूर्वक आजच परिश्रम करायला तयार रहा. वास्तविक प्रत्येक व्यक्तीचे जीवन फक्त वर्तमानातच स्थीर असते. कारण भूतकाळ तर काम करून गेलेला असतो आणि भविष्य अनिश्चित असतो.
     भविष्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही, हे खरे तर मानवजातीच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. नाही तर आपण एक क्षणदेखील सुखी राहू शकलो नसतो. भविष्याची काळजी ही एक प्रकारची वाळवीच आहे. ती आपल्याला आतल्या आत पोखरून मोकळी करून सोडली असते. त्यामुळे भविष्याची चिंता करण्यात काहीच अर्थ नाही. आपण आजचा विचार करायला हवा. आजच्या दिवसाची कामे पूर्ण करा आणि बिनधास्त राहा. भविष्यात यश मिळवायचे असेल तर आजच्या दिवसावर भर द्यायला हवा. आपल्या शेतकर्याचे धोरण लक्षात ठेवा. पावसाच्या सुकाळाचा किंवा दुष्काळाचा तो कसलाच विचार करत बसत नाही. तो आपले काम नियमितपणे करत राहतो. आशा ही महत्त्वाची आहे. तो नेहमी पुढील वर्षी श्रीमंत होऊ,  अशी आशा बाळगून असतो. या शेतकर्याप्रमाणेच आपणदेखील आपले विचार सकात्मक ठेवायला शिकले पाहिजे.
     एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, आपण आपले वर्तमान अशाप्रकारे जगले पाहिजे की, त्यामुळे आपले भविष्य वाया जाता कामा नये. तुमच्या आजमध्येच उद्याचे प्रतिबिंब असते. त्यामुळे आपला वर्तमान यशस्वी होण्यासाठी आपण सतत कामात व्यस्त असायला पाहिजे. वर्तमान चांगले असेल तर भविष्य नक्कीच चांगले असते. इतिहासाच्या पानांत यशस्वी लोकांच्या गाथा लिहिलेल्या असतात. तुम्ही असे काही करा की, त्यामुळे इतिहासदेखील तुमच्या यशाचा साक्षीदार झाला पाहिजे.
     महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही उद्या कोण होणार,हे आज ठरवित असतो, कारण तुम्ही आज काय करीत आहात यावरूनच तुमचे चांगले किंवा वाईट भविष्य नक्की ठरत असते. आपल्या आयुष्यात चुका या होत असतात. वर्तमानातल्या चुकातून आपण शिकत असतो, त्या दुरुस्त करत असतो आणि त्यातून चांगले कार्य आपल्या हातून घडत असते. एक लक्षात ठेवा, कोणीही व्यक्ती अनेक छोट्या किंवा मोठ्या चुका केल्याशिवाय थोर किंवा मोठी व्यक्ती झाली नाही. त्यामुळे फक्त कार्य करीत राहा. त्यातून शिकत आपल्या चुका सुधारत चला, यश तुमच्या मागेमागे धावत येत राहील.

No comments:

Post a Comment