Monday, January 9, 2012

कविता, गाणं हे शब्दातून भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे:बाबासाहेब सौदागर


जत, ( वार्ताहर): कविता, गाणं हे शब्दातून भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. प्रत्येक चित्रपट यशस्वी होण्यासाठी गाण्यांची गरज आहे. माझ्या शब्दांत गावाकडच्या मातीचा गंध असल्याने रसिकांनी माझ्या गाण्यांना भरभरून साद दिली असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी येळवी येथील १७ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
जत येथील मराठी साहित्य सेवा मंचतर्फे येळवी येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या साहित्य संमेलनात श्री. सौदागर बोलत होते. आजच्या घडीला मागणीनुसार गाण्याचा पुरवठा करावा लागतो. पण तरीसुद्धा मी मातीशी इमान राखण्याचा प्रयत्न करतो. गीतकाराने साध्या, सोप्या आणि रसिकांच्या ओठांवर सहज रुळावीत अशी गाणी दिली तरच रसिक ते डोक्यावर घेतात. मराठी चित्रपट सृष्टीत सध्या खूप चांगल्या दर्जाचे चित्रपट येत आहेत. त्याप्रमाणेच संगीताच सुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण झालं आहे. ग्रामीण भागातल्या साहित्यिकांनी करिअर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही श्री. सौदागर म्हणाले.
राज्य बँकेचे संचालक विलासराव जगताप आपल्या भाषणात समाजातील अंधश्रद्धा, भ्रष्टाचार निर्मूलन, दुष्काळी शेतकर्यांच्या प्रश्नांवर साहित्यिकांनी आपल्या लेखणीने परखड्पणे प्रहार करावेत, असे आवाहन केले. यावेळी पत्रकार व लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'हसत जगावे' व डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या 'रंगपंचमी' या काव्य संग्रहाचे गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षस्थानी ' मराठी साहित्य, दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना' या विषयावर परिसंवाद पार पडला. दुष्काळावर तरुण साहित्यिकांनी भरभरून लिहिले असले तरी तो कायमाचा हटवण्याबाबत व त्यावर उपाययोजना करण्याबाबत शासन संवेदनशील नाही. लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक दुष्काळावर बोलून टाळ्या मिळवतात, बक्षीसे मिळवतात पण करत मात्र काही नाही, असा सूर परिसंवादात निघाला. प्रा. सुनीता सूर्यवंशी ( नातेपुते), प्रा. राजेंद्र जेऊर ( मिरज) आणि डॉ. श्रीकांत कोकरे ( इचलकरंजी) यांनी सहभाग घेतला होता.
दुपारच्या सत्रात प्रा. रविंद्र कोकरे ( बारामती) यांनी सांगितलेल्या 'करंजी' ही हास्यकथेमुळे संमेलन स्थळ हास्यसागरात बुडून गेले. विलास माळी ( गडहिंग्लज) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले. मिलिंद शेंडे (पुणे), शिवाजी सातपुते ( मंगळवेढा), लक्ष्मण खेडकर ( पंढरपूर), प्रा. दत्ता सरगर ( मंगळवेढा), इंद्रजित घुले, संतोष जगताप, शशीकांत गानमोटे, श्रीशैल कुलकर्णी, महादेव सवाईराजे, प्रकाश कुलकर्णी ( मिरज), रावसाहेब यादव, लवकुमार मुळे, रशीद मुलाणी आदी कवींनी सहभाग घेतला होता. संमेलनास चंद्रशेखर गोब्बी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव, सरपंच मारुती जमदाडे, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात ग्रामस्थ आणि श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व श्री. संत ज्ञानेश्वर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी- शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
संमेलन पार पाडण्यासाठी कुमार इंगळे, मोहन माने- पाटील, राजू कोळी, प्रदीप डफळे, महादेव बन्नी, भरत वडगावे,प्रा. भाऊसाहेब शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment