Wednesday, January 25, 2012

बालकथा स्वप्नबोध

     एक संत आपल्या ध्यानसाधनेत दिवस-रात्र मग्न होते. त्यांना आपल्या साधनेचा अहंकार उत्पन्न झाला होता.  एके रात्री त्यांना एक स्वप्न पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. समोर देवदूत उभा होता. देवदूत मरण पावलेल्या लोकांना त्यांच्या कर्माचा हिशोब मागत होता. एकेकजण आपापल्या मनुष्य जन्मातील कर्माचा जमा-खर्च त्याच्यापुढे सादर करत होता. शेवटी संतांवरही वेळ आली. तेव्हा देवदूतानं त्यांना विचरलं," तुमच्या जीवनातलं सगळ्यात चांगलं कार्य सांगा, ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळून जाइल."
     संतांनी विचार केला, मी तर माझं सारं आयुष्य पुण्य कार्यातच व्यतीत केलं आहे. एक कार्य चांगलं आहे म्हणून सांगू? शेवटी ते म्हणाले," मी पाच वेळा तीर्थयात्रा केली आहे."
यावर देवदूत म्हणाला," तुम्ही तीर्थयात्रा केली आहे, खरं आहे. परंतु, तुम्ही या कार्याची चर्चा सतत लोकांशी करत आला आहात. त्यामुळे आपले सगळे पुण्य नष्ट झाले आहे."
     संतांना खूप वाईट वाटले. पुन्हा ते धाडस करून म्हणाले," मी रोज परमेश्वराचे ध्यान आणि त्यांच्या नावाचा जप करतो. " देवदूत म्हणाला," तुम्ही परमेश्वराचे ध्यान करत होता. जप करत होता. तेव्हा तिथे दुसरा कोणी आल्यावर तुम्ही मानसिकदृष्ट्या विचलित होत होतात. आणि मग ते पूर्ण करण्यासाठी पून्हा अधिक काळ ध्यान्-जपाला बसावं लागायचं.... चला जाऊ द्या, आणखी एखादं कर्म सांगा."
     संतांना वाटलं, त्यांनी केलेली सगळी तपश्चर्या वाया गेली आहे. त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू ओघळले. इतक्यात संत झोपेतून जागे झाले. त्यांना स्वप्नात दडलेला अर्थ समजला. त्यांना आपल्या साधनेचा झालेला अहंकार दूर झाला. ते आपल्या त्यागमय जीवनाच्या बदल्यात अपेक्षा ठेऊ लागले होते. त्यादिवसापासून मात्र विचलित न होता, परमेश्वराच्या ध्यानात रमू लागले.

No comments:

Post a Comment