Wednesday, January 11, 2012

संस्कारशील विचारांची गरज

     तरुण मुला- मुलींच्या आत्महत्या, तरुणांची गुंडागिरी, व्यसनाधिनता, एकतर्फी प्रेम यांचे वाढते प्रकार आणि शिक्षक -पालकांची हतबलता यामुळे  सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. आजकाल मुलांना काही उपदेशाचे सांगायचे म्हटले तरी  नस्ती आफत ओढवून घेतल्यासारखी परिस्थिती होऊन बसली आहे. मुले आजकाल अपमान सहन करून घ्यायला तयार नाहीत. यातून ते बदला तरी घेतात किंवा स्वतः ला सम्पवून टाकण्याचा प्रयत्न करतात. या टोकाच्या भूमिकांमुळे शिक्षक- पालकांचे मानसिक स्वास्थ्य पार बिघडून गेले आहे. 'सांगावं तरी एक , नाही सांगावे तर एक' अशी द्विधावस्था त्यांची झाली आहे. चुकीचे असल्याचे समजून सांगावे, शिक्षा करावी, तर दुसरेच काही तरी बालंट अंगावर येते. त्यामुळे शिक्षक- पालक या कोणत्याच गोष्टी करायला आता धजावत नाही. दुर्लक्ष केल्यानेही काही तरी उपटतेच, त्यामुळे एखाद्या प्रकरणात कोणता निर्णय घ्यावा, हे त्यांना कळेनासे झाले आहे.      परीक्षेत कॉपी प्रवृत्ती रोखावी म्हणून प्रयत्न करणार्‍या शिक्षकाला भोसकण्याचे , मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत.  मुलीची छेड करणार्‍या युवकास शिक्षा करणार्‍या पालकाला, शिक्षकालाही अंगावर धावून जाण्याचा, मारहाण करण्याचा प्रकार वाढू लागला आहे. आणि चारचौघात अपमानस्पद वागणूक दिली म्हणून पेटून उठणारी पिढी वाढत चालली आहे. तर काहीजण अपमान सहन न झाल्याने मृत्यूला कवटाळणारीही पिढी घडत आहे. माणसातील सहनशीलता संपत चालल्याची ही लक्षणे म्हणावी लागतील. आजची ही पिढी इतकी टोकाची भूमिका का घेत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.  आजकाल पैशाच्या, राजकीय आणि वशिल्याच्या  जिवावर अनेक प्रकार घडत आहेत. खून, बलत्कार काही केले तरी आपल्याला काही होत नाही, त्यामुळे बिनधास्त जगा, बिनधास्त वागा, असा संदेश घरूनच मुलांना मिळत आहे. आणि ज्यांना असा कुठला आधार नाही , असे स्वतः ला असुरक्षित वाटून घेऊन जीवनयात्रा संपवताना दिसत आहेत. 
     वास्तविक जीवन म्हणजे यशापयश, संघर्ष, अपमान  यांचा मेळच आहे. जीवनात या सार्‍या गोष्टी वाट्याला येत राहणार. देवाला,कुबेरालासुद्धा या गोष्टी चुकलेल्या नाहीत. म्हणून काय, जीवनयात्रा संपवायची? समोरच्याचा बदला घ्यायचा? एखादी वस्तू मिळाली नाही, प्रेम मिळाले नाही म्हणून हिरावून घ्यायची का? त्याच्याने सारे प्रश्न सुटणारे आहेत का? सहनशीलता ठेवल्यास अपमानाचा, यशापयशाचा त्रास वाटणार नाही. पण सहनशीलताच संपली आहे. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडवणार्‍या, पालकांना आणखी चिंतेत टाकणार्‍या घटना घडत आहेत. हे मोठे धोकादायक असून समाज कुठल्या स्तराला जाणार असा चिंताजनक प्रश्न उपस्थित होतो. याला खरे तर स्वतः समाजच कारणीभूत आहे. संस्कारात कमी पडत चालल्याची ही लक्षणे आहेत. आपल्या मुलांना संस्कारशील बनवण्यात पालक कुठेतरी कमी पडत आहेत. वास्तविक मुले अनुकरणशील असतात. ती आपल्या आजूबाजूची माणसे, पालक यांच्या बर्‍यावाईट गोष्टींचे अनुकरण करतात. मात्र आपल्या मुलांना चांगल्या-वाइटाची समज करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच असते. परंतु याकडे कर्तव्यापासूनच समाज दूर चालला आहे. 
     समाज वंशाचा दिवा हवा म्हणून स्त्री भ्रूणहत्या घडवित आला आहे.  सध्याच्या आकडेवारीत सहज दिसून येणारी धक्कादायक गोष्ट म्हणजे समाजातील मुलींची संख्या कमी होत चालली आहे.
मात्र यामुळे सामाजिक अस्वास्थ्य कुठल्या थराला जात आहे, याची कल्पना येत असतानासुद्धा माणसे आंधळी होऊन 'मागचा पाढा सत्तावनच' म्हणत आहेत.  हे असेच होत राहिले तर पुढच्या काळात आणखी कोणती बिकट सामाजिक स्थिती ओढवेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून प्रत्येकानेच उत्तम संस्कारांचे संचित भावी पिढीपर्यंत पोचवण्याचे काम मनापासून करायला हवे. पूर्वीच्या काळी  सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते समाजप्रबोधनाचे काम तळमळीने करीत असत. आजच्या काळात एनजीओ ह्या समाजकल्याणाच्या नावाखाली पैसे निर्माण करण्याचे कारखाने तयार झाले आहेत. समाजसेवेचा सारा प्रकारच बदलून गेला आहे. पालक, शिक्षक आता स्वतः समजावून सांगून हात टेकल्याने अशाप्रकारची सल्ले विकणारी दुकाने थाटली आहेत. ही मंडळी निव्वळ सांगण्याचा प्रयत्न करतात. थांबवण्याचा नाही. त्याच्याने फारसा लाभ होत नाही. उलट पैसा मात्र खर्चून जातो.

     समजावून सांगण्याइतपत माणसे खुळी नाहीत, मात्र मुळात संस्कारच बिघडल्याने सारा मामला नादुरुस्त झाला आहे. सध्या सर्वत्र अनागोंदी कारभार चालला आहे. घरादारात मेळ राहिला नाही, शासन -प्रशासनातला घोळ संपला नाही. प्रशासनातील हलगर्जीपणाही वाढला आहे. राजकारणी, नोकरशहा, जनतेतील काही घटक यांनी संगनमताने चालवलेल्या भ्रष्टाचारामुळे सामाजिक स्वाथ्य पार बिघडून गेले आहे. चांगल्या संस्कारावर भर देण्याची आवश्यकता आहे. पालकांनी जाणीवपूर्वक मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या पाल्याच्या चुकीचे खापर दुसर्‍यावर फोडून मोकळे होण्याने प्रश्न मिटणार अथवा संपणार नाहीत. सामाजिक संस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन स्वत:ला खर्‍या अर्थाने समाजप्रबोधनाच्या कामात झोकून दिले पाहिजे. त्यातूनच भावी पिढय़ांना सकारात्मक व संस्कारशील विचार मिळू शकतील. पिढी संस्कारशील घड्ण्यास मदत होईल.    zumbar_dainikaikya, satara 15/1/2012

No comments:

Post a Comment