Tuesday, January 17, 2012

भेकडपणाची लक्षणे

      विरोध करण्याचा सरळधोबट मार्ग लोकांनी सोडून दिला आहे की काय अशी शंका आता यायला लागली आहे. भारतीय लोकशाहीत सत्ताधार्‍याला जितके महत्त्वाचे स्थान आहे, तितकेच किंबहुना त्याहून अधिक  महत्त्व विरोधकालाही आहे. लोकशाहीत   विरोध करण्याचा,  दर्शविण्याचा सनदशीर मार्गही सांगण्यात आला आहे. आजपर्यंत त्याचाच अवलंब केला जात होता. त्याच्याने प्रश्नही सुटत होते. महात्मा गांधींनी तर आयुष्यभर अशाच मार्गाचा अवलंब केला,  पण अलिकडे असे काय घडले आहे की लोकांनी हा सनदशीर मार्ग सोडून आक्रमक, आक्रस्ताळी आणि लोकशाहीला काळिमा फासणार्‍या मार्गांचा अवलंब सुरू केला आहे.  विरोध दर्शविण्यासठी  थप्पड मारण्याचा, चप्पल फेकण्याचा आणि शाई फेकण्याचा अवलंब केला जात आहे. योगगुरू रामदेवबाबा यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नुकताच घडला. याचा अर्थ  राजकारणातली सहनशीलता संपत चालली आहे की काय, असे वाटावे असे हे प्रकार चिंताजनक आहेत.
     वास्तविक विचारांची मतभिन्नता ही आपल्या भारतीय लोकशाहीची खासियत आहे. मतभिन्नता ही सजगतेची लक्षणे आहेत. पण ती व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या , या अशाप्रकारच्या घटना मात्र निश्चितच लोकशाहीच्यादृष्टीने घातक आहेत, असे खेदाने म्हणावे लागेल. यापूर्वीही अशाप्रकारच्या अभद्र घटना  प्रशांत भूषण, कपिल सिब्बल, शरद पवार  यांच्याबाबतीतही घडल्या आहेत. ( अशा घटना केवळ आपल्याच देशात घडताहेत, अशातला भाग नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाही चपलेचा प्रसाद खावा लागला आहे.) यात आणखी मोठे दुर्दैव असे की,  या घटनांकडे राजकीय लोकांनी गांभिर्याने न पाहता त्याला राजकीय रंग देण्याचाच अधिक प्रयत्न चालवला आहे.  या आधी घडलेल्या घटनांनासुद्धा राजकीय रंग देण्याचाच प्रयत्न केला गेला. आता योगगुरू रामदेवबाबा यांच्यावरील शाई शिडकाव्याचा घटनेबाबतीतही  असाच प्रकार घड्त आहे. काँगेसच्या महासचिवांनी या शाई फेकण्याच्या घटनेमागे भाजप-संघाचा हात असल्याचे म्हट्ले आहे.  तर जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्ण्यम यांनी हा भारत मातेचा अपमान असल्याचे सांगून कहरच केला. रामदेवबाबांच्या अंगावर शाई फेकल्याचा  राग धरून बाबा समर्थकांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या यांच्या पोस्टरवर शाई फेकून आपला संताप व्यक्त केला. हे कृत्यही  काँग्रेसने भाजप आणि संघाच्या माथी फोडले.  
     पण प्रश्न इथे असा नाही की, रामदेवबाबावर शाई फेकणारा भाजपा-संघाचा कार्यकर्ता होता की काँग्रेसचा पक्षाचा! शिवाय  असे पाऊल उचलण्यामागे कार्यकर्त्याचा उद्देश कोणता होता, हाही प्रश्न इथे महत्त्वाचा नाही.  मात्र लोकशाहीला  काळिमा फासणार्‍या, जगातल्या बलाढ्य लोकशाहीला बदनाम करणार्‍या  अशा घटना का वाढत आहेत, हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. देशात निवडणुका पूर्वीही होत होत्या, आणि आताही होत आहेत.  आरोप-प्रत्यारोप पूर्वीही  होत होते आणि आजही होत आहेत.  आजच्यासारखे निवडणुका जिंकण्यासाठी सगळे हातखंडे आगोदरसुद्धा वापरले जात होते. पण लोकप्रतिनिधीला, समाजसुधारकाला  चप्पल फेकून किंवा थप्पड मारण्याचा, शाई फेकण्याचा प्रसंग कधी पाहायला आणि  ऐकायला मिळाला नाही. मग आता असे का घडत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. माणसं विरोध करण्यासाठी असला घृणास्पद प्रकार का अंगिकारत आहेत. या गोष्टीचा शोध घेतला जायला हवा.  
     मुद्दा दहशतवादाचा असो अथवा भ्रष्टाचाराचा, आपले खासदार - मंत्री किंवा पक्षाचे पदाधिकारी असल्या काही अर्वाच्च शब्दांचा वापर करताना दिसतात की सभ्य समाज त्याला अजिबात स्थान नाही.  ज्या लोकांवर देश चालविण्याची जबाबदारी आहे, तीच मंडळी संसदेत जो हंगामा घालतात. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करतात, एकमेकांचे थोपाड फोडतात, धमकी देतात. जर ही मंडळी अशाप्रकारे वागत असतील तर आपली लोकशाही कशी बळकट  होणार, असा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या घटना समाजात पून्हा घडू नयेत म्हणून समाजातल्या सगळ्याच घटकाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ दर पाच वर्षांनी निवड्णुका घेण्याने भारतीय लोकशाही  जगातील सर्वात मजबूत लोकशाही कशी बरं निर्माण होईल?   लोकशाही तंत्राशी खेळणार्‍यांचा  लोकप्रियता मिळवण्याचा स्वस्तातला मकसद असू शकतो. मात्र आपल्याला ज्याप्रकारे  सांगण्या- बोलण्याचा हक्क आहे, स्वातंत्र्य आहे, त्याप्रकारे        दुसर्‍याचेही  ऐकून घेण्याची उदारता  दाखवली गेली पाहिजे.  थोर तत्त्वज्ञ वाल्टेयर म्हणतो, कदाचित मी आपल्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, पण तरीही विचार प्रकट करण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे, अधिकाराचे रक्षण करीन. आपण मात्र विचार व्यक्त करणार्‍यावर हात चालवायला लागलो आहोत. ही कुठली लक्षणे म्हणायची? आपली लोकशाही मजबूत होईल, यासाठी झटणार्‍यांची आवश्यकता आहे. दुसर्‍याला थप्पड मारणे, त्याच्यावर चप्पल फेकणे किंवा शाई फेकणे या गोष्टींचे कदापि समर्थन कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही. आणि करताही  कामा नये, अशी कृत्ये करणार्‍याची लक्षणे भेकडपणाची  म्हणायला हवीत. अशावेळेला आपण संयम बाळगून कायद्याला आपले काम करण्याची मुभा दिली गेली पाहिजे.

No comments:

Post a Comment