Sunday, February 18, 2018

अज्ञानातील सूख, लय भारी


     प्रत्येकाला आयुष्यात मोठे यश मिळायला हवे, असे वाटत असते. मान-सन्मान मिळायला हवा, गाडी,बंगला,नोकर-चाकर आपल्या दिमतीला असावेत, अशी स्वप्ने बाळगून असतात.मात्र खरे यश यालाच म्हणायचे का? आयुष्य सार्थकी लागले, आयुष्यात यश मिळवले कशाला म्हणायचे? दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे वाचताना तो तात्कालिक यशाचा आलेख असतो. स्पर्धेत यश मिळवले म्हणजे स्पर्धेत असलेल्या बरोबरच्या स्पर्धकांपेक्षा जास्त गुण मिळवले, मॅरेथॉन असेल तर सर्वांत आधी अंतर पार केले. मग जगण्याच्या स्पर्धेतील यशाची व्याख्या कोणती? यश समाधानाच्या प्रमाणात मोजायचे की सुखवस्तूंच्या प्रमाणात?बहुतांश लोकांना पैसा-संपत्ती मिळवणं म्हणजे यश असं अधिक वाटायला लागलं आहे. त्यामुळेच सरकारी खात्यात साहेबाची नोकरी मिळाली की, पैसा खोर्याने ओढता येतो, हे ग्रहीत धरून आजचा तरुण स्पर्धा परीक्षेच्या मागे लागला आहे. त्याच्या मनात समाजसेवा,देशसेवा या गोष्टी कधी येत नाहीत. एकदा का नोकरी मिळाली की,मग समाजसेवा,देशसेवा आपोआप घडत असते, हे त्यांना माहित आहे. कारण आज या तरुणांना मार्गदर्शन करताना क्लास वन झालेले अधिकारी समाजसेवा आपला धर्म आहे, असे सांगत असतात. त्यामुळे या तरुणांना कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे,माहित आहे.

     एकिकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आपल्या देशात गरीब भारत मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांना रोजच्या जगण्याची भ्रांत असते. रोजचे जगणे जुळवतानाच नाकीनऊ येणार्याकडे  दिवस कसा ढकलायचा याचाच विचार असतो. ’कॅलेंडर बदलणेटाईप जगण्यात अनेकांचा दिवस जात असतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर आयुष्य मर्यादित आहे आणि जगण्याचा उद्देश काय, जीवनात काय करायचे याबद्दल प्रश्न पडतो? तेव्हा खरोखर वाटते अज्ञानात सुख असते. ’बालपण उतू गेले अन् तारूण्य मातलेअशी बहुतेकांची स्थिती असते. काहींची गाडी अगदी ठरल्याप्रमाणे आयुष्याची स्थानके घेत जाते. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मुले, घर, बढती अशा सरधोपटपणे जीवन चाललेले असते. आयुष्याच्या शेवटी वृद्धावस्थेत काय अवस्था होते? आपले आयुष्य समृद्ध झाले असे वाटणारे फार थोडे असतील. श्रीमंत व्यक्तीला समाधानाची प्राप्ती झाली असेल असे मानणे चुकीचे ठरेल. अभिनेते, खेळाडू, उद्योजक त्या-त्या क्षेत्रात मोठे झालेले असतात. त्यांना मानसन्मान, पैसा यांची प्राप्ती होते. मात्र, त्यांचेही ध्येय त्या पुढचे असेल तर किंवा वेगळे असेल तर? त्यात त्यांना यश मिळाले आहे, असे म्हणता येईल का?
     अपघात होतो आणि कुटुंब उद्ध्वस्त होते. छोटे मूल नेमके वाचते. नकळत वय असते. त्यामुळे कोणीतरी त्याला वाढवते. तेव्हा नेमके काय घडलेय, किती नुकसान झालेय याची कल्पना नसल्याने ते मूल सुखात असते. मोठे झाल्यावर हळूहळू त्याला सत्य समजते आणि मग अज्ञानातील सुखाची कल्पना येते. पालकांच्या जिवावर उड्या मारत मोठं होताना कोणत्याही जबाबदारीची जाणीव आपणास नसते. या वयात बहुतेकांना दु:खाचे प्रसंग असतील तर अभ्यास आणि परीक्षेचे तेवढे! पण एकदा आयुष्यातील टप्पे चढत गेले की, मग नातेसंबंधातील हेवेदावे, कामाच्या ठिकाणची स्पर्धा, त्यातील असुरक्षिततेची भावना आदींची माहिती होते आणि मग अज्ञानातील सुखाची किंमत कळते.
शाळेत असताना नसलेला ताप, डोकेदुखी, पोटदुखी असल्याचे सांगून सुटी मारायला बरे वाटतही असेल. स्वत:ला आजार झालेला कोणालाच आवडत नाही. त्यातही जर कर्करोग, मधुमेहासारखे प्रदीर्घ कालावधीसाठी टिकणारे किंवा दुर्धर आजार झाले तर माणूस हे समजताच अर्धमेला होतो. चित्रपटातआपके मा को कॅन्सर हुआ हैहे वाक्य डॉक्टरने सांगितल्यानंतर नायकाच्या चेहर्यावरील भाव पाहिले की समजते अज्ञानात काय सुख असते? कर्करोगासारखे दुर्धर आजाराने ग्रस्त लहान मुलांना कर्करोग म्हणजे काय हेच समजू शकत नाही. ती आपल्या मस्तीत असतात. परंतु मोठयांना याची भीषणता समजत असते आणि ते दु:खाने वेडे होतात.
     आपण आपल्या घरात, शहरात खूप सुरक्षित समजत असतो, पण आजकाल माध्यमांची संख्या आणि तंत्रज्ञान वाढली आहेत. कोणतीही माहिती झटकन पसरते. अगदी शांत, सुरक्षित समजल्या जाणार्या सिंधुदुर्गातही घरफोडी, साखळी चोरीच्या घटना घडल्या आणिघडतात. याबाबत जेवढे जास्त समजेल तेवढे असुरक्षित वाटायला होते आणि अनेकांचे सुख हिरावल्यासारखे होते. अनेक धोके आपल्या आजूबाजूला सतत असतात. परंतु, त्याचे अज्ञानच आपल्याला सुखात ठेवते.
     जगात अनेक गंभीर समस्या आ-वासून समोर आहेत. पाणीटंचाई आणि पर्यावरणीय धोके सर्वसामान्य माणसाला समजणे आवाक्याबाहेरचे आहे. विश्वात पृथ्वी हा छोटासा ग्रह आहे. अशा पृथ्वीला उल्कापाताचा धोका नेहमीच असतो. जे त्यात खोलवर अभ्यास करत आहेत, अशा शास्त्रज्ञांना त्याचा धोका लक्षात येतो. भूकंप केव्हा कुठे होईल हे सांगता येत नाही. भूकंपात हजारो, लाखो बळी गेल्याची उदाहरणे आहेत. परंतु सर्वसामान्य माणूस यासंदर्भातील अज्ञानामुळेच सुखी असतो. लहानपणी आपल्याला बर्याच गोष्टींची कल्पना नसते. त्यामुळे आपण अगदी बिनधास्त वागत असतो. कशाची फिकिर नसते. त्याला घरात गरीबी आहे का श्रीमंती याचा पत्ताच नसतो. आई-वडिलांच्या मर्जीनुसार त्याला मिळत जात असले तरी त्यांचे विश्व मर्यादित असते. म्हणूनच म्हणतात,’लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’. अज्ञानातले सुख मोठे रंजक असते.

No comments:

Post a Comment