Friday, February 10, 2017

गरिबांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी धडपड


       एनी फेरर यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. 1963 मध्ये त्या आपल्या भावासोबत भारतात आल्या होत्या आणि मग इथल्याच झाल्या. मुंबईत शिक्षण झाले आणि एका नियतकालिकेत त्या पत्रकार म्हणून कामाला लागल्या. त्यावेळेला त्यांचे वय 18 वर्षांचे होते.1968 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांची भेट स्पेनहून आलेल्या मिशनरी विन्सेंट फेरर यांच्याशी झाली. त्या दिवसांत ते महाराष्ट्रातल्या मनमाडमध्ये राहून गरिबांना मदत करण्याचा कामाला लागले होते. त्यांचे विचार आणि गरिबांविषयीची त्यांची सेवा-भाव वृत्ती त्यांना फारच प्रभावित करून गेली. मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्याही त्यांच्यासोबत गरिबांच्या सेवेला लागल्या.
      1969 मध्ये त्या विन्सेंटसोबत आंध्रप्रदेशातील अंनतपुरममध्ये आल्या. त्या दिवसांमध्ये अंनतपुरमला भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा क्षेत्रातला बहुंताश भाग याच परिस्थितीला तोंड देत होता. दुष्काळ,प्राथमिक सुविधांची कमतरता आणि रुढी-परंपरा यांनी हा इलाका अगदी जखडला गेला होता. तिथे त्यांनी रुरल डेवलमेंट ट्रस्ट ( आरडीटी) नावाची एक सामाजिक संस्था सुरू केली.याच दरम्यान 1970 मध्ये त्यांचा विवाह झाला
      आता त्या तिथली स्थानिक भाषा अगदी फर्राट्याने बोलू शकतात. त्यांचे वय 70 आहे, मात्र त्या या वयातही महिला आणि मुलांच्या भल्यासाठी न थकता काम करत असतात. सामुदायिक शक्तींना एकटवण्याबरोबरच सहभागातून विकास कार्य करण्यावर जोर देत आहेत.याने प्रेरित होऊन दलित, अदिवासी,ग्रामीण गरीब आणि अन्य मागास वर्गातील लोक मिळून आपल्या अधिकारांची लढाई लढत आहेत. आंध्रप्रदेशातल्या अनंतपुरम,कुरनूल,गुंटूर तथा प्रकाशम आणि त्याचबरोबर तेलंगणातल्या महबूबनगर आणि नालगोंडासह सहा जिल्ह्यातल्या 3 हजार 291 गावांमध्ये आरडीटीचे काम सुरू आहे. त्यांचे म्हणणे असे की,गरिबीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लोकांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.नलामलातल्या जंगलात राहणार्या दहा हजाराहून अधिक चेंचू आदिवासी कुटुंबांचा जीवन स्तर सुधारण्यासाठी ते एकीकृत विकास कार्यक्रम चालवत आहेत. मुलांच्या शिक्षणापासून विकलांगांचा हक्क, सामाजिक आरोग्य, महिला सशक्तीकरण, सामाजिक आवास,ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि पर्यावरण संरक्षण या गोष्टींचा त्यांच्या उद्देशांमध्ये समावेश  आहे. आरडीटीद्वारा तीन सामान्य हॉस्पीटल तर संसर्गजन्य रोगांसाठी एक हॉस्पीटल चालवले जात आहेत. शिवाय 17 ग्रामीण हेल्थ क्लिनिकदेखील चालवली जातात. तसेच कम्युनिटी हेल्थ वर्करच्या रुपाने काम करणार्या महिलांना प्रशिक्षित केले जाते. आरडीटीमार्फत चालवण्यात येणार्या हॉस्पीटलांमध्ये दरवर्षी 13 हजाराहून अधिक शिशू जन्म घेतात. 2801 गावांमध्ये सुरू असलेल्या तीन हजाराहून अधिक पुरक शाळांच्या देखरेखीचे काम करण्यासाठी कम्युनिटी डेवलपमेंट कमिट्यांना प्रशिक्षित करण्यात येते. या शाळांमध्ये दलित, आदिवासी आणि मागास वर्गांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. यातली काही मुले-मुली टेनीस आणि हॉकीसारख्या खेळांचे प्रशिक्षणही घेत आहेत. इतकेच नव्हे तर कॉम्प्युटर चालवतात आणि इंग्रजी भाषादेखील शिकतात. या मुलांना इंग्रजीबरोबरच फ्रेंच,जर्मन आणि स्पॅनिश भाषादेखील शिकवली जाते.जेणेकरून रोजगाराच्या अधिक संधी त्यांना मिळू शकतीलहे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या 98 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी सहजरित्या मिळून जाते आणि त्यांना चांगले वेतन मिळून ते आपल्या कुटुंबांना गरिबीच्या दलदलीतून बाहेर काढून सुखा-समाधानाने जीवन जगू शकतात. आरडीटीचा व्याप मोठा आहे आणि त्यात एनी फेरर आजही या वयात रमून जातात.



No comments:

Post a Comment