Saturday, February 4, 2017

जागर गायनाच्या वारसदार: बसंती बिष्ट


     देशाच्या प्रतिष्ठित सन्मानामध्ये समावेश असलेला पद्मश्री पुरस्कार उत्तराखंडच्या एकमेव जागर गायिका बसंती बिष्ट यांना नुकताच जाहीर झाला आहे.पहाडी क्षेत्रात घरोघरी गायिल्या जाणार्या माता भगवती नंदाचा जागर देश-परदेशात पोहचवण्याचे काम बसंती बिष्ट यांनी केले आहे. राज्याच्या पर्वतीय क्षेत्रात देवी-देवतांची स्तुती जागरच्या सहाय्याने केली जाते. ही परंपरा बसंती बिष्ट यांनी फक्त पुढेच नेली नाही तर जागरवर संशोधन करून त्याला फ्लॅटफॉर्म मिळवून दिला. विखुरलेले साहित्य पुस्तक स्वरुपात लोकांसमोर आणले. जनपद चमोलीच्या देवाल विकासखंडच्या राहणार्या बसंती बिष्ट यांचे जीवन मोठे संघर्षमय राहिले आहे. आई बिरमादेवी यासुद्धा जागर गायच्या. त्याही जागर गायला गायला लागल्या. मग काय! त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. यात त्यांच्या नवर्यासह अख्खे कुटुंब त्यांच्या पाठीशी राहिले. त्यांनी नंदा के जागर-सुफल ह्वे जाया तुम्हारी जात्रा हे पुस्तक लिहिले.

     चमोली जिल्ह्यातल्या बधाण क्षेत्राला नंदा देवीचे सासर मानले जाते. तिथले लोक नंदादेवीचे स्तुतीगीत,पांडवाणी आणि जागर गातात. दर 12 वर्षांनी नंदादेवीची यात्रा सुरू होते,तेव्हा त्यांच्या आगमन आणि निरोपाच्याप्रसंगी अनेक गीत आणि जागर गातात.बसंती बिष्ट यांचा जन्म चमोली जिल्ह्यातल्या ल्वॉणी गावात झाला. कुमाऊं आणि गढवाल दरम्यानच्या या क्षेत्राला पिंडर घाटी असेही म्हटले जाते. त्यांचे वडील मेंढपाळ होते. ते मेंढ्यांच्या केसांपासून लोकर बनवायचे व त्याच्यापासून कांबळ बनवली जात असे. बसंती बिष्ट तीच कांबळ(पखुला) अंगावर घेऊन जागर गायच्या. आजही त्या अंगावर कांबळ ओढून घेतात आणि जागर गातात. आज हा पारंपारिक पोशाख नेसायला लोक लाजतात.
     मेंढ्या-बकर्यांच्या मागे लागून त्यांच्यासारखीच वृत्ती झालेल्या या इलाक्यात महिलांसाठी बरीच बंधने होती. मात्र त्यांच्या वडिलांनी बंधने झुगारून बसंती यांना शाळेला पाठवायला सुरुवात केली. त्यांच्या गावातील शाळेला जाणार्या मुलींमध्ये त्या पहिली मुलगी होत्या. मात्र पाचवीनंतर त्यांना शाळा सोडावी लागली. पंधरा वर्षाच्या असताना त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती लष्करात होते. काही काळ त्यांची पोस्टिंग जालंधरला झाली. तेव्हा त्याही त्यांच्यासोबत राहायला गेल्या. शेजारी बनारसमधील एक व्यक्ती राहत असे, जे रामायणाचा पाठ मोठ्या सुरात गायचे. बंसती बिष्ट त्यांना ऐकायच्या. त्याही भांडी घासताना वैगेरे रामायणाची कडवी गुणगुणायच्या. एक दिवस त्यांच्या नवर्याने गाताना पाहिले, आणि मग त्यांना हार्मोनियम शिकण्यास प्रेरित केले. त्या चंदीगढ येथील प्राचीन कला केंद्रामध्ये शास्त्रीय गायन शिकू लागल्या. तिथून मग त्या गायला लागल्या.या क्षेत्रात मोठे नाव कमावले.

     1996 मध्ये आकाशवाणीला स्वरपरीक्षा झाली.त्यात त्यांना जागर गायला सांगण्यात आले.तिथूनच त्यांना जागर गायिकेचा सन्मान प्राप्त झाला. जागर गायनावरचा पुरुषी अधिकार हळूहळू संपुष्टात आला होता. त्यामुळे परंपरा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. उत्तराखंड आंदोलनादरम्यान त्यांनी कित्येक गाणी लिहिली होती,ही गाणी लोकांना ऊर्जा द्यायची. शिव,भैरव,नंदादेवी आणि कृष्ण यांच्यासह अनेक देवी-देवतांचे जागर त्या गातात. अलिकडे मुली जागर गात नाहीत. नवी पिढी यापासून दूर होत आहे. त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.छोटी-छोटी गाणी त्या लिहित आहेत. वास्तविक जागर ही एक मौखिक परंपरा आहे. त्यांनी एकत्रित करून त्याला त्यांनी पुस्तकाचे रूप दिले आहे.

No comments:

Post a Comment