Wednesday, February 22, 2017

पोलीस खात्यात सुधारणा

      कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास पोलिसांची मोठी व महत्त्वाची भूमिका असते. मात्र, सर्वसामान्य नागरिक पोलिस किंवा पोलिस ठाण्यांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. कारण, अनेकांना फटका बसल्यामुळे पोलिस म्हटला की पुढे येणारेही मागे हटतात. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा फटका आता पोलिसांनाही बसतो आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. राज्य सरकारने 'क्राईम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम' (सीसीटीएनएस) सुरू केली आहे. अशी यंत्रणा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनेकदा गुन्हा घडल्यानंतरही फिर्यादी तक्रार देण्यास टाळाटाळ करतो आणि गुन्हेगार मोकाट सुटतात.
      सध्या अँन्ड्राईड मोबाईलचा जमाना आहे आणि ती प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही घरबसल्या ऑनलाईन तक्रार करू शकतात, हे पोलिस विभागाचे अभिनंदनीय पाऊल असले तरी तक्रारींना केराची टोपली दाखवू नये. कारण, कुठल्याही तक्रारीमागे मोठे प्रकरण दडलेले असू शकतेय. नागरिकांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी ई-कम्प्लेंट हे ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार असून, पथदश्री प्रकल्प म्हणून पुणे शहरात सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्र्याचा विभाग सांभाळत असल्याने त्यांच्या हस्ते या ऑनलाईन तक्रार नोंदविण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यांनी आपले 'वॉलेट' हरविल्याची तक्रार नागपूर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीबाबत तेथील पोलिस निरीक्षकांना फोन करून खातरजमाही करण्यात आली. 'सीसीटीएनएस'च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात माहिती उपलब्ध होते. यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्याबरोबरच गुन्हय़ाची उकल करण्यासाठी मोठी मदत मिळतेय. तंत्रज्ञानात आपल्याला गुन्हेगारांच्या दोन पावले पुढेच राहिले पाहिजे. गुन्हेगारांच्या ठशांचाही डाटा तयार करायचा आहे. या माध्यमातून सर्व प्रकारच्या गुन्हेगारांची माहिती उपलब्ध झाल्यास गुन्हे रोखण्यासाठी उपयोग होणार आहे.        
'सीसीटीएनएस' यंत्रणेसाठी सध्या इंटरनेटचा वेग कमी असून, तो वाढविण्यात येईल. अनेकदा आपली तक्रार नोंदवून घेतली जात नाही, अशा बर्‍याच तक्रारी असतात. यावर महाराष्ट्र पोलिसांनी उपाय शोधला आहे. ई-कम्प्लेंटच्या माध्यमातून नागरिक राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. त्याची खात्रीही लगेचच होऊ शकते. तसेच एसएमएस गेटवेच्या माध्यमातून नागरिकाला आपल्या तक्रारीची सद्य:स्थिती वेळोवेळी मिळणार असल्याने नागरिकांच्या पोलिस ठाण्यातील फेर्‍या कमी होऊन वेळही वाचणार आहे. नागरिकांना संकेतस्थळावर ई-तक्रार नोंदविता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर गुन्हेगारीकरण झाले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही बसतो. सध्या १00 हा पोलिसांचा हेल्पलाईन क्रमांक असला तरी अनेक जण तक्रारीच्या भानगडीत पडत नाही. पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद घडल्यास तक्रारी वाढण्यास मदत होईल, हे नक्की. 

No comments:

Post a Comment