Monday, February 27, 2017

पळत्याच्या मागे का पळता?


तो करतोय मग मला तेच करायला हवं, हा अट्टहास घेऊन जगणारी तरुणाई आपण पाहतो. यश मिळविण्यासाठी गर्दीच्या मागे धावणारी माणसं पाहतो. पण जेव्हा आपण गर्दीच्या मागे धावतो, त्यावेळी आपण आपल्या कौशल्यांकडं दुर्लक्ष करतो आणि आपल्या कौशल्यांकडं जेव्हा आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा आपण कुठेच पोहोचू शकत नाही. एखादा माणूस काही करू लागला की बाकीचे लगेच त्याच्या मागे धावू लागतात. पाहता-पाहता त्या क्षेत्राच्या मागे मोठी गर्दी जमा होते. यामुळे यशाची शक्यता कमी होत जाते. अनेकदा आम्ही जे करू लागतो, दुसरेही तसेच करू लागतात, असे म्हणताना अनेक लोक दिसतात. पण हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपण जेव्हा गर्दीच्या मागे धावत असतो, तेव्हाच असे प्रश्‍न निर्माण होतात. जीवनात यशासाठी कौशल्य जास्त गरजेचं आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. म्हणूनच तुमच्याकडं ज्या प्रकारची कौशल्यं असतील, त्यानुसारच तुमचं कार्यक्षेत्र निवडा. 
तुमच्यात काय आहे, ते पाहा :करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस वेगळा असतो, हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकात काही ना काही वेगळं असतं. यासाठी आपण आपल्या कौशल्यांवर आधारित कार्यक्षेत्रच निवडलं पाहिजे. दुसर्‍यांशी तुलना करून काहीच फायदा होत नाही. जे तुमच्याकडं आहे, ते दुसर्‍याकडं नाही. जे दुसर्‍याकडं आहे, ते आपल्याकडे असेलच असं नाही. दुसर्‍याचा निर्णय आपल्या निर्णयासारखा कसा असू शकतो? ज्या प्रकारची कौशल्यं आपल्याकडं आहेत, ती घेऊन पुढं गेलो, तर जगातील कोणतीच ताकद आपल्याला अडवू शकत नाही. यश मिळवण्यासाठी गर्दीच्या मागे पळण्याऐवजी आपल्या कौशल्यांच्या मागे धावावं आणि त्यानुसारच करिअर निवडावं. 
मनाचा आवाज ऐका : करिअरमध्ये यश मिळवायचं असेल, तर आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. दुसर्‍याचं पाहून निर्णय घेऊ नये. करिअरबाबत आपण एखादा चुकीचा निर्णय घेतला, तर आपल्याला आयुष्यभर पश्‍चात्ताप करत बसावं लागेल. सगळेच जण इंजिनिअरिंग, बँकिंग, मीडिया, सरकारी क्षेत्राच्या दिशेने धावत आहेत. मात्र, तुम्ही त्यांच्यामागं पळू नका. तुम्ही जे करू शकता, जिथे तुम्ही यशस्वी होऊ शकता, त्याच क्षेत्राला आपलं करिअर म्हणून निवडा. 
दुसर्‍याच्या मताला महत्त्व द्या : करिअरमध्ये दुसर्‍यांपेक्षा वेगळे चालण्यासाठी त्यांच्यामागं धावणं थांबवा. दुसर्‍यांचा सल्ला नक्की घ्या. मात्र, तुम्ही जे करू इच्छित आहात, तसंच करा. दुसर्‍याचं ऐकल्यानं आपल्याला त्या क्षेत्रातील आव्हाने आणि शक्यतांची माहिती होते. यशासाठी स्वत:वर आणि स्वत:च्या कौशल्यांवर विश्‍वास ठेवा. गर्दीच्या मागे का पळता? ः जेव्हा आपण गर्दीच्या मागे धावतो, तेव्हा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. गर्दीत पडण्याची शक्यता जास्त असते. लक्ष्य प्राप्त होवो अथवा न होवो याची खात्री नसते. मग काय कराल, तर आपल्यासाठी स्वत: रस्ता बनवा. तुमच्याकडं कौशल्य असतील, तर तुम्ही गर्दीपासून दूर राहूनच लक्ष्य प्राप्त करू शकता. म्हणूनच गर्दीच्या मागे पळण्याऐवजी स्वत:च्या मागे पळा.


No comments:

Post a Comment