Monday, February 13, 2017

(बालकथा) बक्षीस


     श्रावणपूर गावात एक लाकूड काम करणारा कारागीर राहत होता. त्याचं नाव बुद्धिराम. त्याच्याजवळ एक सुंदर घड्याळ होतं. त्याच्या वडिलांनी एक दिवस आपल्या तिन्ही मुलांना बोलावून घेऊन प्रत्येकाला लाकडी घोडा बनवायला सांगितला होता. सगळ्यात चांगला, सुंदर घोडा बनवल्याबद्दल वडिलांनी बुद्धिरामला घड्याळ दिलं होतं. त्याने ते घड्याळ फार सांभाळून ठेवलं होतं.

     बुद्धिरामलादेखील तीन मुलगे होते. ते ज्या ज्या वेळी एकत्र असत, त्या त्या वेळी आपसात भांडत असत. एके दिवशी भांडण इतके विकोपाला गेले की, त्यांच्यात हाणामारी झाली. थोरल्याने धाकट्याला जोराचे ढकलून दिले. तो दगडावर आपटल्याने डोक्याला मोठी जखम झाली. बुद्धिरामला कळून चुकलं की, आपण याला वेळीच आवर घातला नाही तर पुढे फार मोठे परिणाम भोगावे लागतील.
     एक दिवस त्याने तिघांना लाकडाचे छोटे छोटे तुकडे दिले आणि त्याचे म्हणाला," मी दुकानात जाऊन ये ईपर्यंत जो कोणी सुंदर बदक बनवेल, त्याला आजोबाचे किंमती घड्याळ बक्षीस म्हणून दे ईन." तिघांनाही फार आनंद झाला. थोड्या वेळाने थोरला मधल्या भावाला म्हणाला," बघच, मीच सगळ्यांपेक्षा सुंदर बदक बनवतो." त्यावर मधला म्हणाला," नाही, सगळ्यात सुंदर बदक मीच बनवणार." बघता बघता दोघांमध्ये भांडण लागले. एकमेकांना अद्वातद्वा बोलू लागले.
     बुद्धिराम घरी आला, तेव्हा पाहतो काय तर थोरला आणि मधला मुलगा एकमेकांशी भांडताहेत. धाकटा मन लावून बदक बनवतो आहे. वडिलांना पाहिल्यावर दोघेही गप्प झाले. तो दोघांना म्हणाला," मी तुम्हाला काम सांगितले होते, झाले का?"
     तेव्हा थोरला म्हणाला," बाबा, मी कामच करत होतो, पण हा पहिल्यांदा या मधल्यानेच भाम्डायला सुरूवात केली."
     तेवढ्यात मधे पडत मधला म्हणाला," नाही बाबा, दादानेच भांडणाला सुरूवात केली. मी तर आपला मुकाट्याने काम करत होतो." मग दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. आपलेच बरोबर आहे, सांगू लागले. इतक्यात धाकट्याने बदक बनवून बुद्धिरामच्या हातात दिले. बुद्धिरामला तो सुंदर बदक पाहिल्यावर वाटले की, हाच आपला खरा वारस. हाच आपले नाव कमावेल.
     तो दोन्ही मुलांकडे पाहात म्हणाला," आजपासून हे धाकट्याचे झाले. तुम्ही दोघेही सगळा वेळ भांडणात घालवलात. कामावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा असेल तर कोणतेही काम सुंदर होतं. तुम्हाला या तुमच्या धाकट्या भावासारखं धैर्यानं काम करायला हवं. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी हो ऊ शकता."
वडिलांचे हे बोल ऐकल्यावर दोघांच्याही माना खाली झुकल्या. आपली चूक त्यांच्या लक्षात आली.
                                                                                                            




No comments:

Post a Comment